Priyanka Chaturvedi  Pudhari
राष्ट्रीय

Priyanka Chaturvedi | भारतात G20 तर पाकिस्तानात T20 म्हणजे टॉप 20 दहशतवादी; लंडनमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांचा पाकवर घणाघात

Priyanka Chaturvedi | लंडनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाकडून पाकिस्तानमधील दहशतवादावर बोट

Akshay Nirmale

Priyanka Chaturvedi

लंडन : पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत एक मोठा प्रयत्न सुरू केला असून, त्या पार्श्वभूमीवर हे प्रतिनिधीमंडळ 33 जागतिक राजधानी शहरांना भेट देत आहे.

लंडनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पाकिस्तानवर घणाघाती टीका केली.

“भारत G20 चे यशस्वी अध्यक्षपद सांभाळतो, तर पाकिस्तान T20 म्हणजे टॉप 20 दहशतवाद्यांचे आयोजन करतो.” असे त्या म्हणाल्या. त्या भारताच्या दहशतवादविरोधी संदेशासोबत एक सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे मत मांडत आहेत.

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "आम्ही G20 चे अध्यक्षस्थान अतिशय यशस्वीरित्या पार पाडले. एक वर्षभर चाललेल्या या अध्यक्षपदात भारताने अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर नेतृत्व केले.

पण जिथे आम्ही G20 आयोजित करतो, तिथे पाकिस्तान T20 – टॉप 20 दहशतवाद्यांचे आयोजन करतो. या दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकारकडून थेट मदत, निवारा, प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ दिले जाते. हे त्यांच्या धोरणाचाच भाग आहे."

पाकिस्तानने लादेनला लपवून ठेवले होते...

प्रियंका चतुर्वेदी यांनी पाकिस्तानवर "हात मिळवून पाठीत खंजीर खुपसणारा" असा आरोप करत, ओसामा बिन लादेनचा दाखला दिला. "ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानमध्ये लपवून ठेवलेला होता. अमेरिकेचा सहयोगी असूनही त्यांनी बिन लादेनला लपवले.

एक डॉक्युमेंटरी आहे – तुम्ही सर्वांनी पाहावी, त्यातून हे स्पष्ट होते की पाकिस्तान त्याला कसा संरक्षण देत होता."

पाकिस्तानचा फ्री टेररीझम अरेंजमेंटवर भर...

प्रियंका यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवरील उघड पाठबळावर टीका करत म्हटले की, "भारत UK बरोबर Free Trade Agreement साठी चर्चा करत आहे, तर पाकिस्तान त्यांच्या 'FTA' म्हणजे Free Terrorism Arrangement वर भर देत आहे."

भारताच्या या अतिरेकीविरोधी मोहिमेचा उद्देश जगभर पाकिस्तानच्या भूमिकेचे वास्तव समोर आणणे असल्याचे त्यांनी सांगितले.

शिष्टमंडळातील इतर सदस्य

या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद करत असून, त्यांच्यासोबत दग्गुबाती पुरंदेश्वरी, घुलाम अली, अमर सिंग, समीक भट्टाचार्य, माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर आणि राजदूत पंकज सरन हे सहभागी आहेत.

'ऑपरेशन सिंदूर' 7 मेपासून सुरू करण्यात आले असून, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरुद्ध एक ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT