Ramlila Ground Purification Controversy: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी मधील रामलीला मैदानात विजय शंखनाद रॅली केली होती. त्या रॅलीवरून आता राजकारण तापताना दिसत आहे. खरगे यांची रॅली झाल्यानंतर रामलीला मैदानात शुद्धीकरण यज्ञ करण्यात आला. त्यावरून आता काँग्रेस आणि भाजप यांनी एकमेकांविरूद्ध मोर्चे उघडले आहेत.
खरगे यांच्या रॅलीनंतर श्री राम सेना धर्मार्थ सेवा न्यासाकडून रामलीला मैदानात शुद्धीकरण यज्ञ करण्यात आला. संघटनेच्या सदस्यांनी खरगे यांना सनातन आणि हिंदू संघटनांचे विरोधी आहेत. ज्या मैदानावर त्यांची रॅली झाली त्या मैदानावर अशी व्यक्ती आल्यावर मैदनाचे शुद्धीकरण करणं गरजेचं आहे असे सांगत त्यांनी खरगेच्या सनातनविरोधी वक्तव्यांचा हवाला दिला.
मात्र या शुद्धीकरण यज्ञाचा राजकीय भडका चांगलाड उडाला. काँग्रेसच्या अनुसूचित विंगने या घटनेला दलित विरोधी मानसिकता म्हणत भाजपवर टीका केली. काँग्रेसने हे शुद्धीकरण भाजपच्या संबंधित लोकांनी केलं असा आरोप केला आहे. काँग्रेसने ज्यावेळी काँग्रेसची रॅली झाली त्यानंतर रामलीला मैदानावर शुद्धीकरणाची गरज का लागते असा सवाल देखील केला.
८ ऑगस्ट रोजी झालेल्या शंखनाद रॅलीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उत्तराखंड प्रभारी कुमारी शैलजा आणि राज्याचे विरोधपक्षनेते यशपाल आर्य हे मंचावर उपस्थित होते. या सर्वांची सामाजिक पार्श्वभूमी पाहून रामलीला मैदानाचे शुद्धीकरण करण्यात आलं असा आरोप काँग्रेसने केला आहे.
शुद्धीकरणाचा वाद अंगलट येणार असं दिसू लागल्यावर भाजपने या वादापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रता बिष्ट यांनी स्पष्टपणे सांगितलं की शुद्धीकरण यज्ञात भाजपचा कोणताही पदाधिकारी सामील नव्हता. आम्ही या यज्ञाचे आयोजन केले नव्हते.
दरम्यान, आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात खरगेंच्या रॅलीनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरणावरून मोठा गदारोळ माजला. त्यावर जेपी नड्डा यांनी जेवढे खरगेंना याचे दुःख आहे तेवढेच आम्हाला देखील याचं दुःख आहे असं म्हटलं.