राष्ट्रीय

Rahul Gandhi on RSS : '…तर मी RSS ला पाठिंबा देईन; त्यांचे रक्षण करेन', राहुल गांधी असे का म्हणाले?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उद्योगपतींचे हित आणि मोदींची झोप... राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि. १३) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राजधानी दिल्लीतील मावळंकर हॉल येथे आयोजित 'रचनात्मक काँग्रेस कन्व्हेन्शन'मध्ये राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ‘ज्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अभिव्यक्ती देशातून बाहेर काढण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केला जाईल, त्या दिवशी मी स्वतः त्यांचे रक्षण करेन; कारण त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.

‘जुना RSS आता संपला आहे’

काँग्रेस कन्व्हेन्शनमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘एकेकाळी लघू व मध्यम व्यावसायिक हे RSS चे खरे बळ होते. मात्र, नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे याच घटकाचे मोठे नुकसान झाले आहे. RSS मध्ये कॉर्पोरेट प्रभावाची सुरुवात स्व. प्रमोद महाजन यांच्या काळात झाली आणि नरेंद्र मोदी यांनी ती प्रक्रिया पूर्णत्वास नेली,’ असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘आता जुना RSS राहिलेला नसून ही संघटना आता केवळ बड्या भांडवलदारांच्या हितासाठी काम करणारे माध्यम बनली आहे. RSS आणि पंतप्रधान मोदी हे दोघेही फक्त उद्योगपती आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या फायद्यासाठीच काम करत आहेत. देशातील मोठा वर्ग या शक्तींविरुद्ध आवाज उठवण्यास घाबरत आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

'अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न'

आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले, आम्हाला कोणालाही रोखायचे नाही. देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवे, हेच आमचे स्पष्ट म्हणणे आहे. जंतर-मंतरवर घडलेल्या घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, तेथे विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करू इच्छित होते. ते अडचणीत होते आणि आपले म्हणणे मांडू पाहत होते. परंतु सरकार मात्र त्यांना परवानगी नाकारते. 'आम्ही जंतर-मंतरवर सुव्यवस्था राखू, तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकत नाही', अशी सरकारची भूमिका असते.

'RSS च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचेही रक्षण करेन'

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, "आता या सरकारला एक गोष्ट स्पष्टपणे समजली आहे की, हा देश लोकांच्या अभिव्यक्तीला रोखून ठेवू शकत नाही. भारतातील अनेक लोक सध्या भ्याडपणासारखे वागत आहेत. ३००० वर्षे जुना भारत समजून घेण्यापेक्षा आजचा भारत समजून घेण्याची गरज आहे. जर RSS ची अभिव्यक्ती देशातून संपवण्याचा प्रयत्न झाला, तर मी नक्कीच त्यांचे रक्षण करेन, कारण त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे."

"पंतप्रधान मोदींना रात्री झोप लागत नाही"

काँग्रेसच्या या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर तिखट शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, "आमचे काम अगदी सोपे आहे... आम्ही यांना हैराण करून सोडू. मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी यांना रात्री झोप लागत नाही. त्याची वेगळी कारणे आहेत—एक मुख्य कारण आहे आणि अनेक गुपित कारणे आहेत. अमित शाह स्वतःला काय समजत होते? चाणक्य, सरदार पटेल... पण ते कुठे गायब झाले? ते २० दिवस संसदेत येऊ शकले नाहीत. कारण त्यांना पहिल्यांदाच भारताच्या अभिव्यक्तीची खरी ताकद जाणवत आहे. भारत आता बोलू लागला आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे."

परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, "फक्त गळाभेट घेणे म्हणजेच परराष्ट्र धोरण आहे, असा समज यांना कसा झाला हेच कळत नाही." हे सांगताना राहुल गांधी यांनी मंचावर उपस्थित काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारून उपस्थितांना प्रात्यक्षिक दाखवले.

पंतप्रधान मोदींच्या पत्रकार परिषदांवर टिप्पणी करताना राहुल गांधी म्हणाले, "आम्ही जोकरांच्या टोळीला आमच्यावर हुकूम चालवू देणार नाही. पंतप्रधान कधीच पत्रकार परिषद का घेत नाहीत, याचे मला पूर्वी आश्चर्य वाटायचे. मला वाटायचे ही त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. पण नंतर जेव्हा मी त्यांच्यासोबत एका खोलीत बैठकीसाठी बसलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की ते पत्रकार परिषदेला सामोरे जाऊच शकत नाहीत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT