राष्ट्रीय

Qutub Minar : हनुमान चालिसा म्हणण्यासाठी जाणारे कार्यकर्ते ताब्यात

अविनाश सुतार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील कुतुबमिनारजवळ (Qutub Minar) हनुमान चालिसा म्हणण्यासाठी जाणाऱ्या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंगळवारी (दि.१०) ताब्यात घेतले. कुतुबमिनारचे नाव बदलून ते विष्णू स्तंभ करावे, अशी मागणीही आक्रमक कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली.

आक्रमकांनी २७ हिंदू आणि जैन मंदिरे पाडून कुतुबमिनारची (Qutub Minar) उभारणी केल्याचा इतिहास आहे, अशा स्थितीत याठिकाणी हनुमान चालिसा म्हणण्यास परवानगी दिली जावी, असा आग्रह महाकाल मानव सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी चालविला होता. भूलभुलैया ते कुतुबमिनारकडे जात असताना वाटेत त्यांनी हनुमान चालिसा म्हटली, पण कुतुबमिनारपर्यंत या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जाऊ दिले नाही. घटनेनंतर सदर परिसरातील सुरक्षा पोलिसांनी वाढविली आहे. आंदोलनाची हाक देणाऱ्या युनायटेड हिंदू फ्रंटचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व राष्ट्रवादी शिवसेनेचे अध्यक्ष जयभगवान गोयल यांना घरातच अटक करण्यात आली आहे.

भारत ही सनातन भूमी आहे, त्यामुळे कुतुबमिनारसहित सर्व मुघलकालीन इमारती व रस्त्यांची नावे बदलण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी चालवली आहे. मागील काही दिवसांपासून कुतुबमिनार येथील कुव्वत-उल-इस्लाम मशिदीवर लावण्यात आलेल्या मुर्त्या काढण्याच्या मागणीने जोर धरलेला आहे. विशेषतः उलट्या लावण्यात आलेल्या दोन गणेशमूर्तीची विटंबना थांबवावी, अशी मागणी होत आहे. मशिदीच्या भिंतीत लावण्यात आलेल्या सर्व मूर्ती काढून त्यांची प्राण प्रतिष्ठापना करावी व त्यांच्या पूजेला परवानगी दिली जावी, अशीही मागणी होत आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT