PM Modi on 50 years of Emergency : "आज भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने लोकशाहीला वेठीस धरले होते, अशा शब्दांमध्ये आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
'एक्स' पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे की, "आपल्या संविधानाच्या भावनेचे झालेले उल्लंघन कोणताही भारतीय कधीही विसरू शकत नाही. संसदेचा आवाज दाबण्यात आला आणि न्यायालयांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४२ वी घटनादुरुस्ती हे त्यांच्या कृतीचे प्रमुख उदाहरण आहे. गरीब, उपेक्षित आणि दलितांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले होते."
आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात ठामपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सलाम करतो. हे लोक संपूर्ण भारतातून, प्रत्येक क्षेत्रातून, वेगवेगळ्या विचारसरणीतून आले होते. या सर्वांनी एकाच उद्देशाने एकत्र काम केले. भारताच्या लोकशाही संरचनेचे रक्षण करणे आणि ज्या आदर्शांसाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन समर्पित केले. हाच आदर्श जपण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि नव्या निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांचा दारुण पराभव झाला, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
आम्ही आपल्या संविधानातील तत्त्वे अधिक दृढ करण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहोत. आम्ही प्रगतीची नवी शिखरे गाठू आणि गरीब व वंचितांची स्वप्ने पूर्ण करू, अशी ग्वाहीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.