घराणेशाही, आणीबाणी, 'सबका साथ, सबका विकास' या मुद्द्यांवरुन पंतप्रधानांचा काँग्रेसवर निशाणा

PM Narendra Modi | राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला राज्यसभेत उत्तर
PM Modi
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र माेदी. (Image source- X)
Published on
Updated on

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, काँग्रेसवर निशाणा साधला. जातीयवाद, घराणेशाही, 'सबका साथ-सबका विकास' या मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. खोटेपणा, कपट, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे मिश्रण असलेले राजकारणाचे मॉडेल काँग्रेसने तयार केले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेससाठी कुटुंब प्रथम आहे. म्हणूनच, काँग्रेसचे धोरण, वर्तन फक्त त्या एकाच गोष्टीला हाताळण्यातच खर्ची पडले आहे. तर देश आता 'सबका साथ सबका विकास' च्या मार्गावर वाटचाल करू लागला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. इतरांच्या रेषा लहान केल्यामुळे आज काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे. कधी ना कधी हा देश तुम्हाला इकडे (सत्तेत) येण्याची संधी देईल, असे पंतप्रधान मोदी काँग्रेसला म्हणाले.

आणीबाणीवरुन काँग्रेसवर हल्लाबोल

संविधान वाचवण्याच्या विरोधकांच्या मोहिमेचे खंडन करण्यासाठी, पंतप्रधानांनी नेहरूंपासून आणीबाणीपर्यंतच्या घटनांचा उल्लेख करून निशाणा साधला. स्वातंत्र्यानंतर लगेचच काँग्रेसने संविधानाचा आत्मा नष्ट केला, असे ते म्हणाले. जेव्हा देशात निवडून आलेले सरकार नव्हते, तेव्हा सत्तेत असलेल्या लोकांनी संविधानात दुरुस्ती केली. निवडून आलेले सरकार येण्याची वाटही पाहिली नाही. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडले. तेव्हाचे सरकार वर्तमानपत्रांवर लक्ष ठेवत असे आणि लोकशाहीचे लेबल लावून जगभर फिरत असे. हा संविधानाच्या आत्म्याचा पूर्णपणे अनादर होता.

मुंबईत झालेल्या कामगारांच्या संपाचा संदर्भ देत ते म्हणाले की, मजरूह सुलतानपुरी यांनी त्यात एक कविता गायली होती, नेहरूंनी त्यांना तुरुंगात पाठवले. बलराज साहनी एका मिरवणुकीत सहभागी झाले होते आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर वीर सावरकर यांच्यावरील एक कविता प्रसारित करण्याची योजना आखली होती, त्यांना ऑल इंडिया रेडिओमधून काढून टाकण्यात आले. देशाने आणीबाणीचा काळही पाहिला आहे. जेव्हा देव आनंद यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला नाही, तेव्हा त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आमचे मॉडेल समाधानाचे, तुष्टीकरणाचे नाही

पंतप्रधान म्हणाले की, बराच काळ देशाला पर्यायी मॉडेल काय असावे हे तराजूवर तोलण्याची संधी मिळाली नाही. २०१४ मध्ये आम्ही देशाला एक पर्यायी मॉडेल दिले. आम्ही समाधानाचे मॉडेल दिले आहे, तुष्टीकरणाचे नाही. निवडणुका आल्यावर लहान वर्गाला काहीतरी द्या आणि बाकीच्यांना त्रास होताना पहा, अशी काँग्रेसची पद्धत होती. ते म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी बडबड करणे, लोकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून राजकारण करणे ही काँग्रेसची सवय आहे. ते म्हणाले की, एससी-एसटी कायदा मजबूत करून, आमच्या सरकारने दलित-आदिवासी समाजाप्रती आदर आणि वचनबद्धता दाखवली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेस जबरदस्तीने जय भीम म्हणते

पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने दोनदा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. काँग्रेसमध्ये त्यांच्या द्वेष होता. म्हणूनच त्यांना भारतरत्नसाठी पात्र मानले गेले नाही. आज काँग्रेसला जय भीम म्हणायला भाग पाडले जात आहे. जय भीम म्हणताना त्याचे तोंड कोरडे पडते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘’है बहुत अंधियारा, अब सूरज निकलना चाहिए’’

पंतप्रधानांनी कवी नीरज यांच्या ‘’है बहुत अंधियारा, अब सूरज निकलना चाहिए’’ या कवितेचा उल्लेख करून काँग्रेसवर निशाणा साधला. आज केंद्र सरकारने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या काळात परवाना राज होता. लग्नसमारंभांमध्ये साखरेच्या आवश्यकतेसाठी परवाना घेण्यापासून ते संगणक आयात करण्याच्या परवान्यापर्यंत, तो मिळवावा लागत असे. परवाना मिळवण्याचे हे काम लाच घेतल्याशिवाय झाले नाही. काँग्रेसच्या या धोरणांमुळे विकासाचा वेग मंदावला, त्याला जगात हिंदू विकास दर असे म्हटले गेले, असे पंतप्रधान म्हणाले.

मध्यमवर्गावर लक्ष, तरुणांसाठी नवीन संधी

मध्यमवर्गीयांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सरकारचे ध्येय साध्य केले. ते म्हणाले की, आम्ही समाजातील एका मोठ्या वर्गाला करसवलत दिली आहे आणि १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, तीन दशकांच्या कालावधीनंतर आपण एक नवीन शिक्षण धोरण आणले आहे. आज १०-१२ हजार पीएम श्री शाळा बांधल्या गेल्या आहेत. शिक्षण धोरणात बदल करून, मातृभाषेत अभ्यास आणि परीक्षांची तरतूद करण्यात आली. यामुळे गरीब आणि दलित मुलांना त्यांच्या मातृभाषेत डॉक्टर आणि अभियंता बनण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news