Shocking Crime News : दिल्लीतील कल्याणपुरी भागात दांपत्यामधील वादाचे पर्यावसान भयंकर घटनेत झाले. पोलीस कॉन्स्टेबल पतीने आपल्या पत्नीच्या वाढदिवशीच गोळ्या झाडून हत्या केली. प्रियांका असे मृत महिलेचे नाव असून, पोलीस कॉन्स्टेबल आरोपी मनीष भाटी याचा पोलीस शोध घेत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, ही घटना प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडली.
प्रियांका दिल्लीतील अशोक विहारमधील एका खासगी शाळेत कॉम्प्युटर सायन्सच्या शिक्षिका होत्या. तर पोलीस कॉन्स्टेबल मनीष भाटी दिल्ली 'अँटी-थेफ्ट स्क्वॉड'मध्ये कार्यरत होता. प्रियांका आणि मनीष यांचा विवाह २०२३ मध्ये झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास प्रियांका आणि मनीष स्कूटरवरून घराबाहेर पडले. तत्पूर्वी रविवारी रात्री त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला होता. स्कूटरवरून जाताना वाटेतही त्यांच्यातील वाद सुरूच होता.
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, यामध्ये प्रियांका आणि मनीष रस्त्याच्या कडेला स्कूटर थांबवून खाली उतरताना आणि त्यांच्यात जोरदार वाद करताना दिसत आहेत. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली; मनीषने थेट सर्व्हिस पिस्तूलमधून पत्नीवर गोळ्या झाडल्या.
मनीषने पत्नीवर गोळीबार केला. ती गंभीर जखमी झाली असताना अशा अवस्थेत सोडून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. नंतर एका डिलिव्हरी बॉयला रस्त्यावर महिला जखमी अवस्थेत आढळली. त्याने तिला तातडीने लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेले. तिला वाचवण्याचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, ही घटना प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडली.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी शोध मोहीम राबवली असून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आणि घटनेचा क्रम समजून घेण्यासाठी परिसरातील तसेच तो पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हत्येमागील कारण जाणून घेण्यासाठी पोलीस या जोडप्याचे कुटुंबीय आणि ओळखीच्या व्यक्तींचीही चौकशी करत आहेत.
प्रियांका आणि मनीष यांचा विवाह २०२३ मध्ये झाला होता. लग्नानंतर तिला हुंड्याच्या मागणीवरून छळले जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी महिला कक्षाकडे (वुमेन्स सेल) तक्रार करण्यात आली होती, परंतु समुपदेशन आणि नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर तो वाद मिटवण्यात आला होता. मनीष त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.