PM Modi on Women Reservation Bill Pudhari
राष्ट्रीय

PM Modi: विरोध केलात तर... महिला आरक्षण विधेयकावर पीएम मोदींचं भाष्य; विरोधकांना मोठा इशारा

PM Modi on Women Reservation Bill: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकावर विरोधकांना इशारा देत ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं. विरोध केल्यास राजकीय नुकसान होऊ शकतं, असा मेसेज त्यांनी दिला.

पुढारी वृत्तसेवा

PM Modi on Women Reservation Bill: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण आणि परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकांवर जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विधेयक सादर होताच सभागृहात गोंधळ उडाला, विरोधकांनी सरकारवर टीका केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला ऐतिहासिक म्हणले.

सभागृहात गोंधळ, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

विधेयक सादर होताच काँग्रेसने आरोप केला की सरकार संविधानाशी छेडछाड करत आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी मुस्लिम महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली.

यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट सांगितले की धर्माच्या आधारावर आरक्षण देणे संविधानाच्या विरोधात आहे. अखिलेश यादव यांनीही महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मुस्लिम महिलांविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

विधेयकाला मंजुरी

विधेयक सभागृहात सादर करावे की नाही यावर मतदान झाले, ज्यात 207 मतांनी विधेयकाच्या बाजूने निकाल लागला. यामुळे पुढील चर्चेसाठी मार्ग मोकळा झाला.

हा ऐतिहासिक क्षण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना हा क्षण देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं की,“राष्ट्राच्या कार्यकाळात काही क्षण असे असतात जे भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करतात.” भारताची हजारो वर्षांची लोकशाही परंपरा अधोरेखित करत त्यांनी हा निर्णय देशाला दिशादर्शक ठरेल, असं मत व्यक्त केलं.

“महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान देणं आवश्यक”

मोदी यांनी स्पष्ट केलं की विकसित भारत म्हणजे केवळ पायाभूत सुविधा नाहीत, तर महिलांना धोरणनिर्मितीत समान सहभाग मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. “देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला निर्णय प्रक्रियेत सामील करणं ही काळाची गरज आहे,” असं त्यांनी सांगितलं.

पीएम मोदी यांनी विरोधकांना थेट संदेश दिला, “ज्यांनी महिला आरक्षणाचा विरोध केला, त्यांना राजकीय नुकसान झालं आहे. इतिहास याचा साक्षीदार आहे.” त्यांनी सांगितलं की हा मुद्दा राजकारणासाठी वापरू नये, तर देशहिताच्या दृष्टीने स्वीकारावा.

“राजकारण करू नका”

मोदी यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं की हा विषय राजकीय तराजूत मोजू नका. “देशातील महिला आपले निर्णयच नाही, तर आपली नियतही पाहतील,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. परिसीमन प्रक्रियेबाबत त्यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही.

ते म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश एकच आहे आणि तसाच विचार केला पाहिजे. पीएम मोदी यांनी सांगितलं की हा निर्णय घेण्यासाठी आधीच उशिरा झाला आहे. “आता वेळ आली आहे की आपण आणखी उशिरा न करता पुढे जावं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT