परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर. Pudhari Photo
राष्ट्रीय

'Operation Sindoor सुरुच, दहशतवादी पाकिस्‍तानात कुठेही असेल तरी मारले जातील'

परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा सज्‍जड इशारा, पहलगाम हल्‍ला धार्मिक तेढ निर्माण करण्‍यासाठी

पुढारी वृत्तसेवा

भारतीय लष्‍कराने दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्‍यासाठी राबवलेले ऑपरेशन सिंदूर ( Operation Sindoor) सुरूच आहे, असे स्‍पष्‍ट करत दहशतवादी पाकिस्‍तानमध्‍ये कोणत्‍याही ठिकाणी लपले असले तरी मारले जातील, असा सज्‍जड इशारा परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर धर्मांध असून, भारतात धार्मिक तेढ निर्माण होण्‍यासाठीच पहलगाम हल्‍ला घडवून आणला, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. डचमधील माध्‍यम संस्‍था 'एनओएस'ला दिलेल्या मुलाखतीवेळी त्‍यांनी भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका स्‍पष्‍ट केली. दरम्‍यान, यापूर्वीही भारतीय लष्‍कराने ऑपरेशन सिंदूर माेहिम पूर्ण झाले नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले हाेते.

ऑपरेशन सुरू ठेवणे म्हणजे एकमेकांवर गोळीबार करणे नव्‍हे

यावेळी जयशंकर म्‍हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे सुरुच आहे. कारण आम्‍ही या ऑपरेशनच्‍या माध्‍यमातून स्पष्ट संदेश दिला आहे की, यापुढे २२ एप्रिल रोजी झालेल्‍या पहलगाम दहशतवादी हल्‍याची पुनरावृत्ती झाली तर पुन्‍हा एकदा सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही दहशतवाद्यांवर हल्ला करू. पाकिस्तानात दहशतवादी कुठेही असतील, आम्ही त्यांना तिथेच मा. ऑपरेशन सुरू ठेवण्याचा संदेश आहे. ऑपरेशन सुरू ठेवणे म्हणजे एकमेकांवर गोळीबार करण्यासारखे नाही. सध्या लढाई आणि लष्करी कारवाईवर एकमत आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

पहलगाम हल्‍ला धार्मिक तेढ निर्माण करण्‍यासाठी

जम्‍मू-काश्‍मीरमधील पर्यटनस्‍थळ पहलगाममध्‍ये पर्यटकांवर त्‍यांचा धर्म विचारुन गोळ्या झाडण्‍यात आल्‍या. पहलगाममध्ये मारले गेलेले २६ नागरिक हिंदू असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले, याबाबतचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत. या क्रूर हल्ल्यावरून पाकिस्तानमधील दहशतवाद धार्मिक कट्टरतेने किती प्रेरित असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. २६ जणांचा धर्म उघडकीस आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांची हत्या करण्यात आली. भारतात धार्मिक तेढ निर्माण व्‍हावी, यासाठी पहलगाम हल्‍ला घडवलून आणण्‍यात आल्‍याचेही जयशंकर यांनी सांगितले.

पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख मुनीर धर्मांध, जागतिक शांतीसाठीही धोका

पाकिस्तानचे नेतृत्व, विशेषतः लष्कर, आज 'अतिरेकी धार्मिक विचारसरणीने' प्रेरित आहे. ते केवळ प्रादेशिक शांततेसाठीच नाही तर जागतिक स्थैर्य आणि शांतीसाठी धोका बनले आहेत. भारत कोणत्याही परिस्थितीत अशा क्रूरतेला सहन करणार नाही आणि प्रत्युत्तराची रणनीती अचूक, निर्णायक आणि न्याय्य असेल, असेही त्‍यांनी ठणकावले. पाकिस्‍तान सरकार दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे आणि आश्रय देणे थांबवत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही चर्चा शक्य नाही, असा पुनरुच्‍चारही त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT