Operation Sindoor
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी पहाटे (दि.७) एअर स्ट्राईक केला. भारताने आज (दि.७) 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांना अचूक लक्ष्य केले. या धडक कारवाईत ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आज पहाटने भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित नऊ दहशवादी अड्डे उद्ध्वस्त केले. जैश-ए-मोहम्मदचा हावलपूर आणि लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांचे तळ असलेल्या मुरीदके येथे दोन सर्वात मोठे आणि महत्त्वाचे हल्ले झाले. या हल्ल्यात ८० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
यशस्वी हल्ल्यानंतर लगेचच, भारतीय लष्कराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) वर एक छोटा व्हिडिओ जारी केला ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते: “न्याय मिळाला.” ही पोस्ट लवकरच व्हायरल झाली.
२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, भारताने सिंधू पाणी करार निलंबित करण्यापासून ते पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यापर्यंत अनेक निर्बंध लादले. या हल्ल्याचा जागतिक पातळीवरही निषेध करण्यात आला.
पहलगाममधील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय हवाई दल आज पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात युद्ध सराव करणार असताना भारताने ही कारवाई केली आहे. यामध्ये राफेल, मिराज-२०००, तेजस आणि सुखोई-३० सारख्या सर्व आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश असेल. त्याच वेळी, देशातील २५९ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये नागरी सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या सरावात AWACS हवाई संरक्षण प्रणाली देखील सहभागी असेल. या काळात, हवाई दल जमिनीवर आणि हवेत शत्रूचे लक्ष्य नष्ट करण्याच्या क्षमतेची चाचणी घेईल. केंद्र सरकारने सीमा सरावांसाठी एअरमेनना नोटीस (NOTEM) जारी केली आहे. विशिष्ट क्षेत्रातील उड्डाणांबाबत सावधगिरी बाळगण्यासाठी ही सूचना जारी करण्यात आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी म्हणाल्या, "माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिले, त्यामुळे त्यांनी आमचा विश्वास जिवंत ठेवला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. माझे पती कुठेही असले तरी आज त्यांना शांतता लाभली असेल. आज ते शांततेत असतील."