Operation Sindoor :
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. भारताने आज (दि.७) पहाटे 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. या धडक कारवाईनंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपल्या जिवलगांना गमावलेल्या नातेवाईकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
भारतीय सशस्त्र दलांनी या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले. दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचे हे प्रतीक आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेला भारतीय सैन्यदलाने 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले.
२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, भारताने सिंधू पाणी करार निलंबित करण्यापासून ते पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यापर्यंत अनेक निर्बंध लादले. या हल्ल्याचा जागतिक पातळीवरही निषेध करण्यात आला.
पहलगाममधील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय हवाई दल आज पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात युद्ध सराव करणार असताना भारताने ही कारवाई केली आहे. यामध्ये राफेल, मिराज-२०००, तेजस आणि सुखोई-३० सारख्या सर्व आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश असेल. त्याच वेळी, देशातील २५९ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये नागरी सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या सरावात AWACS हवाई संरक्षण प्रणाली देखील सहभागी असेल. या काळात, हवाई दल जमिनीवर आणि हवेत शत्रूचे लक्ष्य नष्ट करण्याच्या क्षमतेची चाचणी घेईल. केंद्र सरकारने सीमा सरावांसाठी एअरमेनना नोटीस (NOTEM) जारी केली आहे. विशिष्ट क्षेत्रातील उड्डाणांबाबत सावधगिरी बाळगण्यासाठी ही सूचना जारी करण्यात आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी म्हणाल्या, "माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिले, त्यामुळे त्यांनी आमचा विश्वास जिवंत ठेवला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. माझे पती कुठेही असले तरी आज त्यांना शांतता लाभली असेल. आज ते शांततेत असतील."