प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
राष्ट्रीय

New RTO Rules : 'आरटीओ'च्या फेऱ्या संपणार! ड्रायव्हिंग लायसन्स ५० वर्षांपर्यंत वैध राहणार?, सरकार नियम बदलण्‍याच्‍या तयारीत

वाहनांशी संबंधित सर्व आवश्यक सेवा पूर्णपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्‍याच्‍या प्रस्‍तावावरही चर्चा

पुढारी वृत्तसेवा

New RTO Rules : देशातील कोट्यवधी वाहन चालक आणि मालकांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि वाहनांशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता (वैलिडिटी) वाढवणे आणि वाहनांशी संबंधित सर्व आवश्यक सेवा पूर्णपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणणे, या दोन सर्वात मोठ्या प्रस्तावांवर सध्या चर्चा सुरू आहे.

५० वर्षांपर्यंत वैध राहणार ड्रायव्हिंग लायसन्स

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, या नवीन प्रस्तावांतर्गत आता ड्रायव्हिंग लायसन्स थेट ५० वर्षांच्या वयापर्यंत वैध राहू शकते. सध्या नवीन ड्रायव्हिंग लायसन्स साधारणपणे २० वर्षांसाठी वैध असते. यानंतर त्‍याचे पुन्‍हा नूतनीकरण करावे लागते. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते, या नवीन पावलामुळे सर्वसामान्य जनतेला वारंवार होणाऱ्या कागदपत्रांच्या कटकटीतून आणि रिन्यूअलच्या लांबलचक प्रक्रियेतून मोठा दिलासा मिळेल. सरकारचे 'ईज ऑफ लिविंग' म्हणजेच सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्याच्या मोठ्या मोहिमेचा हा एक भाग आहे.

घरबसल्या होणार वाहनाचे 'नाव ट्रान्सफर'

लायसन्ससोबतच दुसरा मोठा बदल वाहनांच्या खरेदी-विक्रीबाबत होणार आहे. सरकार अशा एका प्रणालीवर काम करत आहे, ज्यामुळे वाहनाची मालकी बदलणे (व्हीकल ओनरशिप ट्रान्सफर) आणि परमिट रिन्यूअलसारखी अत्यंत महत्त्वाची कामे पूर्णपणे डिजिटल होतील. हा प्रस्ताव मंजूर झाला, तर जुनी गाडी खरेदी केल्यानंतर किंवा विकल्यानंतर नाव ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. घरबसल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनच्या माध्यमातून हे सर्व काम अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल.

राज्यांच्या महसुलाचे नुकसान होणार का?

या संपूर्ण बदलामुळे काही राज्यांमध्ये महसुलाचे (रेव्हेन्यू) नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, यामुळे राज्य सरकारांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम होणार नाही. लायसन्स आणि वाहनांशी संबंधित फी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहजपणे गोळा केले जातील. फरक फक्त एवढाच असेल की, अर्जदाराला कोणत्याही कामासाठी स्वतः आरटीओ कार्यालयात जाण्याची सक्ती नसेल. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आता डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने काम करेल.

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरही कडक कारवाई

नियम सोपे करण्यासोबतच सरकार वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या कारवाईच्‍या तयारीत आहे. नवीन प्रणालीमध्ये, चालान आणि नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना 'नेगेटिव्ह मार्किंग' (गुण वजा करणे) दिले जाईल.एखाद्या चालकाच्या खात्यात ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नेगेटिव्ह पॉइंट्स जमा झाले, तर त्याचे लायसन्स सस्पेंड केले जाईल किंवा कायमचे रद्द केले जाईल. यामुळे एकीकडे प्रामाणिक आणि नियम पाळणाऱ्या चालकांचा प्रवास सोपा होईल, तर दुसरीकडे बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर वचक बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT