तृणमूल खासदार महुआ मोइत्रा. Pudhari
राष्ट्रीय

Trinamool Congress crisis : "लालची, मतलबी अन् डरपोक गद्दार..." ; TMC बंडखोरांवर महुआ मोइत्रा भडकल्या; दिलं थेट आव्हान

तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा

पुढारी वृत्तसेवा

Trinamool Congress crisis : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला (TMC) लागलेल्या मोठ्या धक्क्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस, असंतोष आणि बंडखोरी आता थेट कोलकात्याहून देशाची राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. सोमवारी (८ जून) TMC मधील हा अंतर्गत कलह अधिकच वाढला, जेव्हा पक्षाच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी दावा केला की, पक्षाच्या जवळपास २० खासदारांनी केंद्रात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या दाव्यासह पक्षाच्या संसदीय दलातील फूट आता उघड झाली आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक

एकीकडे आज ममता बॅनर्जी भाजपविरोधातील पुढील रणनीतीसाठी आपले पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यासह 'इंडिया' आघाडीच्या घटक पक्षांसोबत बैठक घेत होत्या; तर दुसरीकडे, त्यांच्याच पक्षाचे १४ खासदार पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक करत होते. या बैठकीला उपस्थित खासदारांनी काकोली घोष दस्तीदार यांना आपले नेते मानले असून, लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले आहे.

'बघूया तुम्ही किती मोठे हिरो आहात?'

या संपूर्ण घडामोडींवर संतप्त झालेल्या लोकसभा खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी महुआ मोइत्रा यांनी बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. कृष्णानगरच्या खासदार मोइत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) बंडखोर खासदारांना खुले आव्हान दिले आहे की, 'जर तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा.'

ते सर्व लालची, मतलबी आणि डरपोक...

"२०२४ मध्ये हे खासदार TMC च्या तिकिटावर निवडून आले होते. हा जनादेश NDA साठी नव्हता. ते सर्व लालची, मतलबी आणि डरपोक गद्दार आता भाजपमध्ये जाऊ शकतात; पण आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखवा. बघूया तुम्ही किती मोठे हिरो आहात!"

आमदारांनंतर आता खासदारांचे बंड

आज तृणमूलचे ज्येष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय यांनी दिला. गेल्या १३ वर्षांपासून राज्यसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद (Chief Whip) राहिलेल्या रॉय यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर लगेचच, रॉय हे TMC च्या किमान पाच लोकसभा खासदारांसोबत बंद दाराआड चर्चा करतानाचा एक फोटो समोर आला. यामुळे पक्षाच्या आमदारांमधून सुरू झालेली बंडखोरी आता थेट संसदीय दलापर्यंत (खासदार) पोहोचल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

पक्षांतरासाठी किती खासदारांची गरज?

या घडामोडींनंतर काही वेळातच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचा ताफा दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या घराबाहेर पोहोचला. यादव हे बंगाल निवडणुकीत भाजपचे मुख्य रणनीतीकार होते. त्यांच्या निवासस्थानी अधिकारी यांनी TMC च्या २० लोकसभा खासदारांची भेट घेतल्याचे समजते. या खासदारांनी तिथे गुप्त बैठक केली. पक्षबदलाच्या कायद्याचा (अँटी-डिफेक्शन लॉ) फास टाळून अधिकृतपणे वेगळा गट स्थापन करण्यासाठी या बंडखोरांना तृणमूलच्या २८ लोकसभा खासदारांपैकी किमान १९ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT