नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका विधानसभेची मुदत संपण्याआधीच होणार आहेत. २६ नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा कोणताही विचार सध्यातरी केलेली नाही. ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. (Maharashtra Assembly election 2024 )
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दै. पुढारीशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र विधानसभेच्या विद्यमान सरकारचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्याआधी महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. वेळेत निवडणूका घेणे, ही ही घटनात्मक सक्ती असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. वास्तविक २६ नोव्हेंबरपर्यंत निवडणुका न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. निवडणूक आयोगाने अशी परिस्थिती निर्माण होऊ देण्यास स्पष्ट नकार दिला. निवडणूक आयोगाच्या नकारामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये पूर्ण होतील आणि नवे सरकारही निर्धारित वेळेत स्थापन होईल, असे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी, हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभांच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली होती. यावेळी आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली नाही. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका सोबतच जाहीर होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाने तसे न करता केवळ हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकांची घोषणा केली.
यावर स्पष्टीकरण देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची तारीख एकाच वेळी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या. मात्र यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने दोन राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका नंतर एकत्र होणार आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तारखेला उशीर झाल्याची काही तांत्रिक कारणेही त्यांनी दिली. ते म्हणाले की, पुरामुळे मतदान अधिकाऱ्यांना त्यांचे काम पूर्ण करता आलेले नाही. याशिवाय अनेक सण आहेत. पितृ पक्ष, गणेशोत्सव, नवरात्री, आणि दिवाळी येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर मध्ये निवडणुकांसाठी सुरक्षा बलाची गरज जास्त लागेल हे ही एक कारण त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. राजीव कुमार यांच्या या उत्तरांमुळे निवडणुकीची तारीख वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ही शंका दूर करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलले असता, विहित मुदतीत निवडणुका पूर्ण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.