Lucknow Ashiana murder case: लखनौमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २१ वर्षाच्या बीकॉम शाखेच्या विद्यार्थ्याने २० फेब्रुवारी रोजी आपल्या वडिलांची गोळी घालून हत्या केली. त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने भयानक कृत्य केलं. त्यानं वडिलांचे हातपाय तोडले, तुकडे केले अन् उरलेलं धड हे निळ्या ड्रममध्ये घालून ते लखनौमधील आशियाना भागातील घरात ठेवलं.
या घटनेनं वर्षापूर्वी झालेलाय घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. मेरठमधील २९ वर्षाच्या मर्चंड नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत याचा त्याच्या पत्नी मुस्काननं प्रेमी साहील शुक्लाच्या साथीनं खून केला होता. त्याचा मृतदेह देखील निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता.
दरम्यान आता लखनौमध्ये असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांचे मुलानं बीकॉम सोडून NEET करावं असं मत होतं यावरून मुलाचा आणि वडिलांचा वाद झाला होता. त्यानंतर त्यानं तब्बल एक वर्षानंतर मेरठ प्रकरणाबाबत वाचलं अन् त्यानं खूनाचं प्लॅनिंग केलं.
लखनौ क्राईम ब्रांचच्या डीसीपी विक्रांत वीर यांनी सांगितलं की मुलामध्ये आणि वडिलांमध्ये बीकॉम ऐवजी नीटची परीक्षा देण्यावरून वाद झाला होता. डीसीपी म्हणाले, 'मनवेंद्र सिंह (वय ४९) गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत अशी तक्रार त्यांच्या मुलानं दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलात तपास केला अन् त्यानंतर २१ वर्षाच्या अक्षत सिंहला अटक केली. त्याच्या वक्तव्यात विसंगती आढळल्यानंतर त्याच्यावर संशय वाढला. त्याची चौकशी केली असता गुन्ह्याची उकल झाली.'
डीसीपींनी सांगितलं की, आशियाना सेक्टर एल मधील तीन मजली घरामध्ये फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. हा खून २० फेब्रुवारी रोजी सकाळी ४.३० मिनिटांनी करण्यात आला. डीसीपी म्हणाले, 'मानवेंद्र यांच्यासोबत वाद झाल्यानंतर अक्षतने त्यांच्या वडिलांची लायसन्स राफल घेऊन त्यांच्यावरच गोळी झाडली. वडिलांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजो अक्षतने हा गुन्हा त्याची ११ वीत शिकणाऱ्या लहान बहिणीच्या समोरच केला. त्यानंतर त्यानं बहिणाला देखील जर याची कुठं वाच्यता केलीस तर तुला देखील ठार मारेन अशी धमकी दिली.
डीसीपी पुढे म्हणाले, 'बहिणीला संपूर्ण गुन्ह्याची माहिती होती. मात्र तिने याची कुठंच वाच्यता केली नाही. मानवेंद्र हे वर्धमान पॅथॉलॉजी लॅबचे मालक होते. ते मद्य व्यापारी देखील होते. दरम्यान, हा गुन्हा लपवण्यासाठी अक्षतने पोलिसांना त्यांच्या वडिलांनी त्याला सकाळी ६ वाजता उठवलं आणि ते दिल्लीला चालले आहेत संध्याकाळपर्यंत परत येतो असं सांगितलं. मात्र मानवेंद्र यांचे तीन मोबाईल क्रमांक ऑफलाईन झाले होते. त्यामुळं कुटुंबीय चिंतेत आलं होतं. अक्षत देखील असंच दाखवत होता.
दरम्यन, आशियानाचे एसएचओ क्षेत्रपाल यांनी सांगितलं की, 'अक्षतने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावरील रिकाम्या खोलीत आणला. त्यानंतर त्यानं घरातील साहित्य वापरून मृतदेहाचे तुकडे केले. त्यातील काही तुकडे गाडीत घालून निर्जन स्थळी नेऊन ते टाकून दिले.
यानंतर मृतदेहाचं धड आणि शीर हे प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरलं आणि रूममध्ये हा ड्रम लपवून ठेवला. अक्षतने उरलेल्या मृतदेहाची नंतर विल्हेवाट लावण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यापूर्वीच तो सापडला. सोमवारी सकाळी पोलिसांनी घरावर छापा टाकला अन् अक्षतला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे मृतदेहाचा काही अवशेष असलेला ड्रम देखील सापडला. फॉरेन्सिक तज्ज्ञ घरातील आणि गाडीतील रक्ताच्या डागांची तपासणी करत आहेत. मृतदेहाचे मिसिंग पार्ट शोधण्याचं काम सुरू आहे.'
पोलिसांनी सांगितलं की अक्षत गाडी धुवत असताना तिच्या काकीला संशय आला होता. त्यावेळी त्यांनी त्याला विचारणा केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली. ज्यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली त्यावेळी अक्षतने पहिल्यांदा वडिलांनी आत्महत्या केल्याचा दावा केला. त्यानंतर त्यानं खून केल्याची कबुली दिली अशी माहिती डीसीपींनी दिली.