Mallikarjun Kharge Rajya Sabha speech
नवी दिल्ली : राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोकशाहीत विचारधारा वेगळ्या असल्या, तरी राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नसतात. येथे 'मतभेद' असले तरी 'मनभेद' नसतात. म्हणूनच सभागृहात एकमेकांवर टीकास्त्र डागतानाच, कधीकधी विरोधकांनाही गुदगुल्या होतील, अशी मिश्किल विधाने केली जातात. यामुळे गंभीर असणारे सभागृह काही क्षण हास्याच्या कारंज्यांनी फुलून जाते. असाच काहीसा अनुभव बुधवारी (दि. १८) राज्यसभेने घेतला. राज्यसभेचा निरोप घेणारे सदस्य आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मिश्किल टिप्पणीमुळे संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खर्गे यांच्या मिश्किल टिप्पणीला खखळून हसत दाद दिली.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खर्गे यांनी आज (दि. १८ मार्च) निरोप समारंभाचे भाषण केले. यावेळी त्यांनी या सभागृहातील अनुभवांनी आपल्याला कसे समृद्ध केले, यावर भाष्य केले. खर्गे यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याबद्दल संवाद साधला, ज्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आहे. (शरद पवार पुन्हा सभागृहात परतणार आहेत).
देवेगौडा यांच्याबद्दल बोलताना खर्गे म्हणाले, "मी त्यांना ५४ वर्षांपासून ओळखतो आणि त्यांच्यासोबत कामही केले आहे. पण काय झाले माहिती नाही. त्यांनी आमच्यासोबत डेटिंग केली, आमच्यावर प्रेम केले, पण लग्न मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केले."खर्गेंच्या या मिश्किल टोमण्यावर पंतप्रधान मोदींसह संपूर्ण सभागृह खळाळून हसले.
१९९६ मध्ये एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान होते. यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांच्या युनायटेड फ्रंट सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर २०१८ मध्ये कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेस आघाडीने सरकार स्थापन केले होते. मात्र, नंतर जेडीएसने भाजपासोबत युती केल्याने खर्गे यांनी ही फटकेबाजी केली.
खर्गे यांनी आरपीआय (ए) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचीही फिरकी घेतली. "ते त्यांच्या कवितांमधून नेहमी मोदीजींची स्तुती करतात. त्यांना दुसरी कोणती कविता माहितच नाही," असे खर्गे म्हणताच काँग्रेस सदस्य खळखळून हसले.
पंतप्रधान मोदींनी निरोप घेणाऱ्या खासदारांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "राजकारणात कधीही पूर्णविराम नसतो. तुमचे अनुभव आणि योगदान नेहमीच स्मरणात राहील. नवनिर्वाचित खासदारांनी देवेगौडा, खर्गे आणि शरद पवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून शिकले पाहिजे, ज्यांनी आपल्या आयुष्यातील निम्म्याहून अधिक काळ संसदीय कार्यात व्यतीत केला आहे.
आठवलेंचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, "सभागृहात विनोद आणि उपरोधासाठी खूप वाव असतो, असे आम्ही ऐकायचो. आजकाल ते कमी होत चालले आहे; पण आमचे आठवले मात्र 'एव्हरग्रीन' आहेत." दरम्यान, यावर्षी राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर उर्वरित जागांसाठी सोमवारी निवडणूक पार पडली.