जगदलपूर : माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्यासह एकूण ३१ जणांची हत्या झालेल्या छत्तीसगडमधील झीरम खोरे नरसंहार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या १० माओवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने बुधवारी (दि. १६) फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश अजय सिंह राजपूत यांनी सायंकाळी सुमारे पाच वाजता या शिक्षेची घोषणा केली.
सर्व दोषी सध्या जगदलपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. शिक्षा सुनावताना आरोपींचे नातेवाईकही न्यायालय कक्षाबाहेर उपस्थित होते. बीजापूर आणि दंतेवाडा येथूनही काही नातेवाईक जगदलपूरला पोहोचले होते.
याआधी विशेष न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयात प्रमिला मोडियाम, सुमित्रा पुनेम, मुक्का मांडवी, मडकामी देवा, कोसा कवासी, आयत मरकाम, बंजामी सेना, चैतू लेकाम, जोगा मडकामी आणि महादेव नागा यांना दोषी ठरवले होते. त्यांना सात कलमांखाली दोषी ठरवण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण १०१ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते.
काँग्रेसच्या 'परिवर्तन यात्रे'वर दरभा भागातील झीरम खोऱ्यात माओवाद्यांनी २५ मे २०१३ रोजी अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात माजी विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा, तत्कालीन प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नंदकुमार पटेल, त्यांचे पुत्र दिनेश, माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल, माजी आमदार उदय मुदलियार आणि योगेंद्र शर्मा यांच्यासह नागरिक आणि सुरक्षा दलाचे जवान अशा एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण हल्ल्यामुळे त्यावेळी राज्यातील काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांची फळी जवळपास संपुष्टात आली होती.