नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आशिया पॅसिफिक नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत केले. राजधानी दिल्ली येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे, ज्यामुळे नागरिकांसाठी प्रवासाची सोय लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि संपूर्ण देशात कनेक्टिव्हिटी वाढली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलेल्या क्षेत्रांपैकी आम्ही नागरी विमान वाहतूक क्षेत्राद्वारे लोक, संस्कृती आणि समृद्धी जोडण्याचे काम करत आहोत. यावेळी पंतप्रधानांनी 'दिल्ली ठराव' स्वीकारत असल्याचे जाहीर केले. दिल्ली ठराव देशाच्या विमान वाहतूक क्षेत्राला पुढे नेण्याच्या उद्देशाने एक धोरणात्मक रोडमॅप आहे. हा ठराव आशिया-पॅसिफिक नागरी वाहतूक क्षेत्रात सुरक्षा, सुरक्षितता आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी केला आहे. या माध्यमातून सदस्य राष्ट्रांमधील सहयोगाची भावनाही अधोरेखित होते.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या भागीदारीत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आयोजित केलेल्या या परिषदेत संपूर्ण आशिया-पॅसिफिक देशांमधील विमान वाहतूक मंत्री, नियामक संस्था आणि उद्योग तज्ञ एकत्र आले होते. सार्वजनिक-खाजगी क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यावर भर देणे, पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वतता आणि कर्मचारी प्रशिक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही या परिषदेत चर्चा झाली.