indian government issues advisory after nepal violence helpline numbers released
काठमांडू : नेपाळमध्ये सुरू असलेल्या अशांततेमुळे आणि वाढत्या हिंसाचारामुळे भारत सरकारने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विदेश मंत्रालयाने (MEA) याबाबत एक ॲडव्हायझरी जारी करून भारतीयांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलण्यास सांगितले आहे. जे भारतीय नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत, त्यांना घराबाहेर न पडण्याचा आणि रस्त्यांवर गर्दी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील निर्बंधांविरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांवर भारत सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. या राजकीय अराजकतेच्या परिस्थितीत आतापर्यंत किमान १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील निर्बंधांविरोधात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांनंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी (दि. 9) आपल्या पदाचा राजीनामा दिला.
नेपाळमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काठमांडूसह नेपाळच्या अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
भारत सरकारने म्हटले आहे की, जर कोणत्याही भारतीय नागरिकाला मदतीची आवश्यकता असेल, तर त्यांनी +977–980 860 2881 (व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध) आणि +977–981 032 6134 (व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध) या हेल्पलाइन क्रमांकांवर नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा.
विदेश मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही गेल्या काही दिवसांपासून नेपाळमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अनेक तरुणांचा जीव गेल्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. मृतकांच्या कुटुंबांप्रती आमच्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो.’
भारत सरकारने दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांवर जोर देत म्हटले की, ‘नेपाळ हा एक जवळचा मित्र आणि शेजारी देश आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, तेथील सर्व संबंधित पक्ष संयम राखतील आणि शांततापूर्ण मार्गाने तसेच चर्चेतून या समस्यांवर तोडगा काढतील.’
73 वर्षीय पंतप्रधान ओली यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. ते म्हणाले, ‘समस्या सोडवण्यासाठी आणि घटनेनुसार राजकीय तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान पदावरून पायउतार होत आहे.’ ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळच्या लष्कराने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.