नवी दिल्ली: मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसने भरलेली भारताची 'शिवालिक' आणि 'नंदा देवी' ही दोन जहाजे जगातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या 'होर्मुज सामुद्रधुनी'तून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. इराणच्या विशेष सहकार्यामुळे हा मार्ग मोकळा झाला असून, ही जहाजे आता भारताच्या दिशेने वेगाने झेपावत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर भारत आणि इराणच्या नेतृत्वामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. या चर्चेनंतर इराणने भारतीय ध्वज असलेल्या या दोन्ही गॅस टँकर्सना सुरक्षित मार्ग देण्यास मंजुरी दिली. इराणसह या क्षेत्रातील इतर देशांच्या सहकार्यामुळे हा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला.
'शिवालिक'नंतर 'नंदा देवी' जहाजाने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून यशस्वीरित्या बाहेर पडून आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात प्रवेश केला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नौकेला आता भारतीय नौदलाकडून संरक्षण दिले जात असून, भारताच्या दिशेने होणाऱ्या पुढील प्रवासात नौदल तिला मार्गदर्शन करेल.
देशातील काही भागांत सध्या स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई असल्याच्या अफवा आणि बातम्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर रांगाही पाहायला मिळाल्या. मात्र, केंद्र सरकारने ही भीती फेटाळून लावत घाबरून जाऊ नका, असे आवाहन केले आहे. आता ही दोन मोठी जहाजे लवकरच भारतीय बंदरावर दाखल होणार असल्याने एलपीजीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल.
भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, इराण आणि भारताचे हितसंबंध एकच असून दोन्ही देश जुने मित्र आहेत. फतहाली म्हणाले की, "इराण होर्मुजच्या क्षेत्रात भारतीय जहाजांना पूर्ण सुरक्षा देईल. युद्धोत्तर काळात भारताने विविध क्षेत्रांत इराणला सहकार्य करावे, अशी आमची अपेक्षा आहे."