India-Iran Relations
नवी दिल्ली: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर भारत सरकारने अधिकृतपणे शोक व्यक्त केला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन खामेनी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी दूतावासात ठेवलेल्या शोकपुस्तकावर स्वाक्षरी केली आणि शोक व्यक्त केला.
विक्रम मिस्री यांनी इराणच्या राजनैतिक प्रतिनिधींशी चर्चा करून भारताचा शोकसंदेश त्यांच्याकडे सुपूर्द केला..भारताने इराणशी दीर्घकाळ राजनैतिक आणि आर्थिक संबंध राखले आहेत. म्हणूनच, या घटनेला भारताने दिलेला प्रतिसाद प्रादेशिक राजनैतिकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर, पश्चिम आशियातील बदलत्या घडामोडींच्या दृष्टीने भारताची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भाष्य करत प्रदेशात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. "कोणत्याही समस्येचे समाधान लष्करी संघर्षातून निघू शकत नाही," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच शाश्वत उपाय असल्याचे सांगत, पश्चिम आशियातील वाढता तणाव जगासाठी चिंतेचा विषय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
सध्याच्या संघर्षाच्या काळात भारताने अत्यंत संतुलित आणि सावध पवित्रा घेतला आहे. एकीकडे इराणसोबतचे पारंपरिक संबंध जपत असतानाच, दुसरीकडे जागतिक शांतता आणि स्थिरतेचा आग्रह भारत धरत आहे. प्रादेशिक संतुलन राखण्यासाठी आणि स्वतःच्या धोरणात्मक हितांचे रक्षण करण्यासाठी भारताचे हे धोरण महत्त्वपूर्ण असल्याचे परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा या आठवड्यात झालेल्या एका हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती चिघळली आहे. या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवाईला जबाबदार धरले जात असून, इराणसह त्याच्या मित्रराष्ट्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली आहे.