Harish Rana Euthanasia Case 
राष्ट्रीय

Harish Rana Euthanasia Case | "बेटा आता पुन्हा कधीच दुखणार नाही" हरीशला निरोप देताना मातेने घेतले शेवटचे चुंबन; वाचा मन सुन्न करणारी कहाणी

Harish Rana Euthanasia Case | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुलाला निरोप देताना माता-पित्याचा टाहो

पुढारी वृत्तसेवा

गाझियाबाद : वृत्तसंस्था

शनिवार, १४ मार्चची ती सकाळ... गाझियाबादमधील राजनगर एक्सटेन्शन येथील एम्पायर सोसायटीच्या १३ व्या मजल्यावरील त्या फ्लॅटमध्ये नातेवाईक, शेजारी, डॉक्टर आणि काही अधिकारी जमले होते.

मात्र, कोणाच्याही तोंडून शब्द फुटत नव्हता. घरात पसरलेली शांतता इतकी भयावह होती की, श्वासांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. ही वेळ होती एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला आणि एका पित्याने आपल्या म्हातारपणाच्या काठीला कायमचा निरोप देण्याची. गेली १३ वर्षे आपल्या मोठ्या भावाची लक्ष्मणासारखी सेवा करणाऱ्या धाकट्या भावाला माहिती आहे की, त्याच्या रामाच्या कष्टप्रद जीवनाचा वनवास आता संपत आहे.

पण हा वनवास संपल्यानंतर त्याच्या घरच्या अयोध्येत आनंद नाही, तर कायमचा सन्नाटा पसरणार आहे. माता-पित्याचा ४५८८ दिवस संघर्ष गेल्या १३ वर्षांत (सुमारे ४५८८ दिवस) हरीशच्या आई-वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी मंदिर, मशीद आणि मोठमोठे दवाखाने पालथे घातले. मेदांतापासून अपोलोपर्यंत सर्वत्र उपचार केले. पण डॉक्टरांनी असाध्य असल्याचे घोषित केले होते.

मुलाची तडफड पाहवत नसल्याने शेवटी हताश पालकांनी सर्वोच्च न्यायालयात इच्छामृत्यूसाठी दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टाने हरीशच्या इच्छामरणाला परवानगी दिली. हा निर्णय ऐतिहासिक होता. कारण भारतातील ही पहिलीच घटना होती. तुम्ही तुमच्या मुलाला सन्मानाने निरोप देत आहात, अशी भावना या वेळी न्यायालयाने व्यक्त केली होती.

अंतिम निरोपाचा तो क्षण

परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शनिवारी हरीशला एम्सच्या पॅलिएटिव्ह केअर विभागात हलवण्यात आले. स्ट्रेचर दरवाजातून बाहेर निघताना आई निर्मलादेवी यांनी मुलाचा चेहरा हातात घेऊन त्याचे शेवटचे चुंबन घेतले, तर वडील अशोक राणा यांनी त्याच्या केसांवरून हात फिरवला.

लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि मुलाला एम्सकडे नेताना आईने पदराने तोंड दाबून हंबरडा फोडला. आम्ही ४५८८ दिवस या वेदनेत काढले आहेत. पण मुलाची ही वेदना संपवण्याचा निर्णय त्यापेक्षाही जास्त क्लेशदायक आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आता सरकारी देखरेखीखाली हरीशचा पुढचा प्रवास सुरू झाला असला तरी एका कुटुंबाच्या संघर्षाची ही करुण कहाणी समाजमन सुन्न करून गेली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

३२ वर्षीय हरीश राणा हा २०१३ पासून परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होता. २०१३ मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी चंदीगड विद्यापीठात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा हरीश चौथ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या मेंदूला आणि मणक्याला गंभीर इजा झाली. तेव्हापासून तो अंथरुणाला खिळलेला होता. त्याचे शरीर जिवंत होते, पण मेंदूने काम करणे थांबवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT