Success Story file photo
राष्ट्रीय

Success Story: कॅन्टीनमध्ये फक्त ९० रुपये पगार होता, आज आहे ५००० कोटींचे साम्राज्य; कसं बदललं नशीब?

एकेकाळी राजकोटच्या एका सिनेमा हॉलमध्ये अवघ्या ९० रुपये पगारावर पोस्टर चिकटवणारे आणि गेट सांभाळणारे चंदूभाई आज ५,००० कोटी रुपयांच्या स्नॅक साम्राज्याचे सर्वेसर्वा आहेत.

मोहन कारंडे

Success Story:

नवी दिल्ली: एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास म्हणजे 'बालाजी वेफर्स'चे संस्थापक चंदूभाई विराणी. एकेकाळी राजकोटच्या एका सिनेमा हॉलमध्ये अवघ्या ९० रुपये पगारावर पोस्टर चिकटवणारे आणि गेट सांभाळणारे चंदूभाई आज ५,००० कोटी रुपयांच्या स्नॅक साम्राज्याचे सर्वेसर्वा आहेत. एका छोट्या शेडमधून सुरू झालेला हा प्रवास आज भारतीय बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण करून आहे.

वडिलांनी दिलेले २० हजार आणि सुरुवातीचा संघर्ष

चंदूभाईंचा जन्म गुजरातच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. १९७२ मध्ये त्यांचे वडील पोपट विराणी यांनी आपली नापीक जमीन विकून मिळालेले २०,००० रुपये तिन्ही मुलांना दिले. चंदूभाई आणि त्यांच्या भावांनी राजकोटमध्ये शेती अवजारांचा व्यवसाय सुरू केला, पण नशिबाने साथ दिली नाही. दोन वर्षांतच हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आणि कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.

सिनेमा हॉलमध्ये साफसफाई ते पोस्टर चिकटवण्यापर्यंत काम

व्यवसाय बुडाल्यानंतर पोट भरण्यासाठी चंदूभाई राजकोटच्या 'एस्ट्रॉन सिनेमा'च्या कॅन्टीनमध्ये नोकरीला लागले. तिथे त्यांना महिना ९० रुपये पगार मिळायचा. त्या काळात त्यांनी केवळ गेट सांभाळले नाही, तर सिनेमाचे पोस्टर चिकटवणे आणि रिकाम्या वेळेत प्रेक्षकांना खुर्च्या दाखवण्याचे कामही केले. हलाखीची परिस्थिती इतकी होती की, ५० रुपये भाडे देऊ न शकल्यामुळे त्यांना घर सोडावे लागले होते. अनेकदा फाटलेल्या सीट शिवून देण्याच्या बदल्यात ते एका प्लेटचा नाश्ता मिळवायचे.

एका संधीने बदलले नशीब

कॅन्टीनमध्ये काम करताना त्यांच्या लक्षात आले की, चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये बटाटा वेफर्सची प्रचंड क्रेझ आहे. त्यांनी हीच संधी ओळखली. १९७४ मध्ये घराच्या अंगणात एका छोट्या शेडमध्ये त्यांनी चिप्स बनवण्याचे प्रयोग सुरू केले. शुद्धता आणि चवीमुळे त्यांच्या चिप्सची मागणी सिनेमा हॉलच्या बाहेरही वाढू लागली.

बालाजी वेफर्सचा उदय

१९८९ मध्ये त्यांनी ५० लाखांचे कर्ज घेऊन गुजरातमधील सर्वात मोठा बटाटा वेफर प्लांट सुरू केला. १९९२ मध्ये 'बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड'ची अधिकृत स्थापना झाली. त्यांच्या देवघरात असलेल्या हनुमानच्या मूर्तीवरून त्यांनी ब्रँडचे नाव 'बालाजी' ठेवले. आज या कंपनीकडे चार अवाढव्य कारखाने असून दर तासाला सुमारे ३,४०० किलो चिप्स तयार केले जातात.

यशाची गरुडझेप

केवळ १० वी पर्यंत शिकलेल्या एका माणसाने आपल्या जिद्दीच्या जोरावर जागतिक कंपन्यांना टक्कर देणारे स्वदेशी साम्राज्य उभे केले आहे. चंदूभाईंची ही यशोगाथा आजच्या तरुण उद्योजकांसाठी एक मोठी प्रेरणा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT