नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात रब्बी हंगामाची गरज भागवण्यासाठी युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस आणि एसएसपी खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असल्याची माहिती केंद्रीय रसायन व खत मंत्रालयाने शुक्रवारी दिली. यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात अंदाजित १८०.१८ लाख मेट्रिक टन (एलएमटी) युरियाची आवश्यकता आहे. दरम्यानच्या काळात ३८.४३ एमएलटी युरियाची विक्री करण्यात आली. तर, राज्यांकडे ५४.११ एमएलटी साठा शिल्लक आहे. युरिया प्रकल्पांमध्ये १.०५ एलएमटी, बंदरांमध्ये ५.०३ एलएमटी साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रालयाने दिली.
डाय अमोनियम फॉस्फेट अर्थात डीएपीची यंदाच्या रब्बी हंगामात अंदाजित ५५.३८ एमएलटीची आवश्यकता असून राज्यांकडे सध्या १२.३३ एलएमटी डीएपी उपलब्ध आहे. खत विभागाकडून ३६.९ एलएमटी उपलब्ध राहील, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय म्युरिएट ऑफ पोटॅश अर्थात एमओपीची आवश्यकता १४.३५ एलएमटी असून आतापर्यंत ३.०१ एलएमटी एमओपीची विक्री करण्यात आली आहे. राज्यांकडे अद्याप ५.०३ एमओपी शिल्लक आहे.
देशात यंदाच्या हंगामात ५६.९७ एलएमटी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमची (एनपीकेएस) आवश्यकता आहे. आतापर्यंत १५.९९ एलएमटीची विक्री करण्यात आली आहे. राज्यांकडे २४.७७ एलएमटी एवढा साठा शिल्लक आहे. सिंगल सुपर फॉस्फेटची (एसएसपी) आवश्यकता ३३.६४ एलएमटी असून राज्यांकडे १५.५४ एलएमटीसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत ९.२५ एलएमटी एसएसपीची विक्री झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
हेही वाचलंत का ?