फरीदाबाद: फरीदाबादमधील एका महाविद्यालयात इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पालकांनी असा आरोप केला आहे की, शिक्षकांना न सांगता बाहेर बिरयानी खाण्यासाठी गेल्यामुळे शिक्षिका तिला रागावली होती. शिक्षिकेने तिला चार तास उन्हात उभे राहण्याची शिक्षा दिली. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली आली होती, असा आरोप मृत विद्यार्थिनीचे वडील प्रमोद कुमार यांनी केला आहे.
ही घटना गाझीपूर रोडवरील नवोदय विद्या निकेतन सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये घडली. या शाळेचे मुख्याध्यापक आर. के. शर्मा यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि विद्यार्थिनीला कोणतीही शिक्षा दिली गेली नव्हती, असे सांगितले.
मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, जान्हवी 'वॉशरुम'ला जात असल्याचे सांगून वर्गाबाहेर पडली होती. कथित शिक्षा आणि ही घटना यांचा कोणताही संबंध नसल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असून मुलीच्या पडण्यामागचे नेमके कारण शोधले जात आहे.
डबुआ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुमेर सिंग यांनी सांगितले की, "विद्यार्थिनीने हे पाऊल का उचलले, याच्या सर्व बाजूंची सखोल चौकशी केली जात आहे. घटनेमागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्ती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होतील. सध्या तपास सुरू आहे." पोलीस सध्या शाळा व्यवस्थापन, शिक्षक, वर्गातील सोबती आणि मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाकडून माहिती गोळा करत आहेत. या दुर्देवी घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील कारवाई सुरू आहे.