Sanjay Dina Patil controversial remarks
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली आहे. आगामी काळात अशी वक्तव्ये होऊ नयेत, याची काळजी घेतली जाईल. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते, असे स्पष्ट करत दररोज माध्यमांसमोर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जी वक्तव्ये करत आहेत, त्याविरोधात राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या राज्यसभा खासदार आणि प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज (दि. २५) दिली.
डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पत्रकार आणि माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्याबाबत कोणीही अपमानास्पद किंवा चुकीची भाषा वापरणे अयोग्य आहे. अशा घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांना तातडीने समज दिली असून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांची विधाने सातत्याने चिथावणीखोर स्वरूपाची असतात. महिलांच्या अनुषंगाने चुकीचा उल्लेख करून वक्तव्य करणे अयोग्य असून सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींनी बोलताना आचारसंहिता पाळली पाहिजे. संजय राऊत सोशल मीडियावर बंदूक दाखवणारा फोटो पोस्ट करतात, अशा प्रकारच्या कृतीतून कोणाला धमकी दिली जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राऊत रोज रोज नको ती भाषा बोलतात, असेही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही डॉ. ज्योती वाघमारे टीका केली. जेव्हा त्यांच्या पक्षातील लोकांच्या कुटुंबांवर संकट आले होते, तेव्हा त्यांची विचारपूस करण्याची गरज होती, त्यांना आधार देण्याची गरज होती; मात्र उद्धव ठाकरेंनी ते केले नाही. आता खासदार गेल्यावर दौरा म्हणजे वरातीमागून घोडे नाचवण्याचा हा प्रकार आहे. ठाकरे गटाने आधी स्वतःचे घर सांभाळावे. त्यांच्या पक्षातील खासदार आणि आमदार कुठे आहेत, याचीच त्यांना कल्पना नसते आणि उठसूट दुसऱ्यांवर टीका करणे त्यांनी बंद करावे, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच ‘पिक्चर अभी बाकी है’ असे म्हटले असून आगामी काळात आणखी राजकीय घडामोडी घडतील, असे म्हणत ऑपरेशन टायगर दुसऱ्या टप्प्यात सुरू असल्याचे संकेत दिले.