Congress MP Sudha Ramakrishnan x
राष्ट्रीय

MP chain snatched Delhi | चोरट्यांनी चक्क महिला खासदाराचीच सोनसाखळी हिसकावली; राजधानी दिल्लीतील प्रकार

MP chain snatched Delhi | उच्च सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागातील घटनेमुळे खासदार शॉकमध्ये; गृहमंत्र्यांना पत्र लिहून वेधले लक्ष

Akshay Nirmale

Congress MP Sudha Ramakrishnan chain snatched Delhi

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या उच्च सुरक्षा असलेल्या चाणक्यपुरी भागात कॉंग्रेसच्या खासदार सुधा रामकृष्णन यांच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात इसमाने हिसकावल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेनंतर खासदार सुधा र. अत्यंत धक्क्यात असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.

काय घडले ?

तामिळनाडूतील मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या सुधा रामकृष्णन या सकाळी सहकारी खासदार डीएमकेच्या राजाथीसोबत वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या.

सकाळी अंदाजे 6.15 ते 6.20 च्या दरम्यान त्या पोलंड दूतावासाजवळील गेट क्रमांक 3 आणि 4 च्या दरम्यान होत्या, तेव्हा एक स्कूटीस्वार त्यांच्या समोरून हळूहळू येत होता. हेल्मेटमुळे त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता.

सोनसाखळी हिसकावली, गळ्याला इजा व कपडे फाटले

अचानक या स्कूटीस्वाराने सुधा यांच्या गळ्यातील सुमारे चार सोवरेन वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या झटापटीत सुधा यांच्या गळ्याला जखम झाली असून त्यांचा चुडीदारही फाटला.

या प्रसंगात त्या थोडक्यात खाली पडण्यापासून बचावल्या. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या सहकारी खासदाराने आरडाओरड करत मदतीची मागणी केली.

घटनास्थळाजवळ असलेल्या दिल्ली पोलिसांच्या मोबाईल पेट्रोलिंग वाहनाला ही घटना कळवण्यात आली. त्यानंतर सुधा रामकृष्णन यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांना पत्र; सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर सुधा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "जर दिल्लीच्या उच्च सुरक्षा असलेल्या चाणक्यपुरीसारख्या भागात, जिथे विविध देशांचे दूतावास आणि महत्त्वाचे शासकीय निवासस्थानं आहेत, तेथे महिला खासदार सुरक्षित नाही, तर सामान्य महिलांचे काय?"

तसेच त्यांनी या घटनेचा तपास तातडीने करून आरोपीला पकडावे आणि आपली सोनसाखळी परत मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. "ही घटना केवळ एक चोरी नाही, तर महिला आणि लोकप्रतिनिधी यांच्या सुरक्षिततेवरच प्रश्न उपस्थित करणारी आहे," असं त्या म्हणाल्या.

राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, विरोधी पक्षांनी दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेस व अन्य पक्षांनी यावरून भाजप सरकारवर टीका करत गृहमंत्रालयाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

देशाची राजधानी, तीही सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या चाणक्यपुरीसारख्या भागात असा प्रकार घडणे अत्यंत गंभीर बाब आहे. एक महिला खासदारही सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? हा प्रश्न या घटनेनंतर अधिक तीव्र झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT