Climate Change Sleep Impact : जगभरात वेगाने होणाऱ्या हवामान बदलाचे आणि वाढत्या तापमानाचे भीषण परिणाम मानवाच्या आरोग्यावर थेट दिसू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे केवळ दिवसच नव्हे, तर रात्रीही तापू लागल्याने जगभरातील लोकांची झोप उडाली आहे. 'क्लायमेट सेंट्रल' या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, उष्ण रात्रींमुळे जगातील सामान्य व्यक्तीची वर्षाला तब्बल ५६ तास झोप कमी होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे या जागतिक संकटाचा सर्वाधिक फटका भारताला बसत असून, देशातील दक्षिण आणि किनारपट्टीच्या भागातील नागरिकांची वर्षाला तब्बल ९० तासांपेक्षा जास्त झोप हिरावली जात आहे.
'क्लायमेट सेंट्रल'ने जगभरातील १,३३८ शहरांचे विश्लेषण केले आणि असे आढळले की, हवामान बदलामुळे झोपेचे हे नुकसान १९७० च्या दशकाच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे.
झोपेवर होणारा हवामान बदलाचा परिणाम जगातील उष्ण प्रदेशांमध्ये सर्वाधिक तीव्र आहे. उष्णतेमुळे झोप कमी होण्याचे प्रमाण मध्यपूर्वेतील शहरांमध्ये सर्वाधिक आढळले, तर दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि पश्चिम आफ्रिकेतील काही भागांमध्येही याचे लक्षणीय परिणाम दिसून आले.'क्लायमेट सेंट्रल'च्या रिपोर्टनुसार, दक्षिण भारत आणि आग्नेय आशियातील काही शहरांमधील रहिवाशांची रात्रीच्या वेळी वाढत्या तापमानामुळे वर्षाला ७८ ते ९१ तास झोप कमी झाली.
या रिपोर्टने भारतीयांची चिंता वाढवली आहे. कारण दक्षिण आणि किनारपट्टीवरील शहरांमधील रहिवाशांची विशेषतः चेन्नई, नेल्लोर आणि पुद्दुचेरी — दरवर्षी ९० ते ९३ तास झोप कमी होत आहे. तिरुचिरापल्ली, कोची, कोझिकोडे आणि गुंटूर ही शहरेही सर्वाधिक प्रभावित भारतीय शहरांच्या यादीत आहेत; येथे उष्ण रात्रींमुळे रहिवाशांची वर्षाला सुमारे ९० तास झोप कमी होत आहे.
मुंबईत वर्षाला सरासरी ८४ तास आणि विशाखापट्टणममध्ये ८७ तास झोप कमी झाल्याची नोंद झाली. याउलट, थंड प्रदेशांमध्ये कमी परिणाम दिसून आला; उदाहरणार्थ, श्रीनगरमध्ये वर्षाला २७ तास झोप कमी झाल्याची नोंद झाली आहे.
भारतीय शहरांमध्ये झोप कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे काळाच्या ओघात रात्रीच्या किमान तापमानात झालेली वार्षिक वाढ. १९९१ ते २०२० या काळात रात्रीचे सरासरी तापमान १९.३ अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, २०२४ मध्ये हे तापमान २०.२°C पर्यंत पोहोचले आहे. ही तापमानातील वाढ १९०१ नंतरची सर्वोच्च पातळी आहे.
'क्लायमेट सेंट्रल'च्या मते, उबदार रात्रींच्या वेळी शरीराला स्वतःचे तापमान कमी करणे कठीण जाते. शरीर थंड होऊ न शकल्यामुळे रात्रीची पूर्ण झोप घेणे शक्य होत नाही. आता हवामान बदलामुळे वाढत्या उष्ण रात्रींचा भारतातील होणारा परिणाम हा चिंता वाढविणारा आहे.