Chidambaram on NIA Pudhari
राष्ट्रीय

Chidambaram on NIA | पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून आले हे कसं ठरवलं? चिदंबरम यांचा NIA वर सवाल

Chidambaram on NIA | एनआयए माहिती उघड का करत नाही? भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

P. Chidambaram on NIA

नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) वर थेट सवाल उपस्थित केला आहे. "हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते, हे ठरवण्यामागे NIA कडे कोणते ठोस पुरावे आहेत?" असा सवाल त्यांनी केला आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड वाद निर्माण झाला असून भाजपाने काँग्रेसवर देशद्रोहाचे आरोप केले आहेत.

चिदंबरम यांचे वक्तव्य नेमकं काय?

एका खासगी मुलाखतीदरम्यान बोलताना चिदंबरम म्हणाले, "NIA ने आतापर्यंत काय तपास केला, हे सांगण्यास ते तयार नाहीत. दहशतवाद्यांची ओळख पटली आहे का? ते कुठून आले हे त्यांनी स्पष्ट केलं का? कदाचित हे देशांतर्गत दहशतवादी असतील.

मग तुम्ही हे का गृहित धरत आहात की ते पाकिस्तानातून आले होते? याचा कोणताही पुरावा दिला गेला नाही."

पंतप्रधान मोदी गप्प का?

त्यांनी हेही विचारलं की ऑपरेशन 'सिंदूर'बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप मौन का बाळगून आहेत? "सरकारला बहस टाळायची आहे का? युद्धविरामाची घोषणा भारत सरकारने केली नव्हती, ती तर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती, हे सांगायला सरकार तयार आहे का?" असेही ते म्हणाले.

भाजपची जोरदार टीका

चिदंबरम यांच्या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "काँग्रेस नेहमीप्रमाणे पाकिस्तानला क्लीन चिट देण्याची घाई करते. आमचे सैनिक जेव्हा पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा सामना करतात, तेव्हा काँग्रेसचे नेते इस्लामाबादचे वकील वाटतात."

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर गद्दारीचा आरोप करत म्हटलं, "काँग्रेस आता गद्दार पक्ष झाला आहे. राहुल गांधींनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसोबत करार केला, देश विकण्याचा प्रयत्न केला होता, पण मोदींमुळे ते थांबवण्यात आले."

खासदार संजय जायसवाल म्हणाले, "राज्यसभेत जेव्हा चर्चा होणार आहे, तेव्हा हे प्रश्न बाहेर का विचारले जात आहेत? सरकार लोकसभेत सर्व प्रश्नांची उत्तरं देईल."

पार्श्वभूमी - पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पाहलगाम भागात सुरक्षा दलांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारतीय सुरक्षादलांनी ऑपरेशन 'सिंदूर' अंतर्गत कारवाई करत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले.

मात्र, त्यानंतर या ऑपरेशनवर आणि हल्ल्याच्या मूळ सूत्रधारांवर राजकीय वाद सुरू झाला आहे.

पी. चिदंबरम यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर असून, त्यावर NIA आणि केंद्र सरकारने स्पष्टता देणे गरजेचे आहे. मात्र, या मुद्द्यावरून सुरू झालेली राजकीय चिखलफेक देशाच्या सुरक्षेच्या विषयावर गंभीर चर्चा होण्याऐवजी राजकारणाकडे वळत असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT