Census Phase Two Caste Details: यंदाच्या २०२७ च्या जनगणनेसाठी पहिल्यांदाच जातीची माहिती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर आई वडील यांच्या जन्माची तारीख आणि जन्म स्थळ याची देखील माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी कोणते कागदपत्र द्यावे लागणार आणि ४५ हजार पेक्षा जास्त जातींचा डेटा कसा सांभाळला जाणार याची माहिती घेऊयात...
२०२७ च्या जनगणनेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या जनगणनेत १९३१ नंतर पहिल्यांदाच लोकांच्या जाती देखील समाविष्ट होणार आहेत. त्याचबरोबर लोकांना आपल्या आई वडिलांची जन्म तारीख आणि जन्म स्थळ देखील सांगावे लागण्याची शक्यता आहे. जनगणनेनंतर ज्यांच्याजवळ पासपोर्ट असणार आहे. त्यांना त्यांचा पासपोर्ट नंबर देखील द्यावा लागणार आहे. आधार क्रमांक तुम्ही स्वेच्छेने देऊ शकता.
गृह मंत्रालयाने सोमवारी एक अधिसुचना जारी केली आहे. याच मंत्रालयाने लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या बर्फाळ प्रदेशात जनगणनेचा दुसरा टप्पा १ सप्टेंबर पासून ३० सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी १७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट पर्यंत लोक आपली माहिती स्वतः ऑनलाईन देखील भरू शकतात. याचा अर्थ जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रश्नावली लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जो व्यक्ती स्वतः त्याची जाती सांगेल तीच जाती नोंदवली जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी ड्रॉप डाऊन मेन्यू असणार आहे. जातीचा पुढचा कॉलम हा फक्त जे एससी आणि एसटी क्षेणीत येत नाहीत त्यांच्यासाठी असणार आहे.
ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये फक्त त्या राज्य किंवा एससी आणि एसटीची यादी दाखवली जाईल. व्यक्ती जनगणनेवेळी जी आपली जात सांगेल ती त्याच पद्धतीनं लिहिली जाईल. तुम्हाला एससी एसटी किंवा इतर कोणत्याही जाती सिद्ध करण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाहीये.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की २०११ मध्ये सामाजिक आणि आर्थिक तसेच जाती जनगणनेत लोकांनी आपली स्वतःची जात सांगितली होती. त्यानुसार ४५ हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या जातींचे नाव समोर आले आहेत. एवढा मोठा आकड्याचा योग्य उपयोग करणं अत्यंत कठिण झालं होतं. मात्र यावेळी डिजीटल तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मदतीला असल्यानं हा आकडा व्यवस्थित करणे आणि वेगवेगळ्या क्षेणीत वर्गवारी करणे सोपे होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदाच लोकांना त्यांच्या आई वडिलांची जन्मतारीख आणि जन्म स्थान सांगावे लागणार आहे. ही माहिती नागरिकता निश्चित करण्यासाठी महत्वाची मानली जात आहे. २०११ च्या जनगणनेसोबतच राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टरचे देखील काम केलं गेलं होतं. या २०२१ च्या जनगणनेसोबत पुन्हा करण्यात येणार होते. मात्र ते पुन्हा टाळण्यात आलं. आता २०२७ च्या जनगणनेपासून ती गोष्ट वेगळी केली आहे. २०१० मध्ये एनपीआरवेळी लोकांनी त्यांच्या राष्ट्रीयत्वाबाबत देखील माहिती दिली. मात्र यामुळे कोणालाही नागरिकत्वाचा अधिकार मिळणार नाही असं स्पष्ट केलं होतं.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकांकडून त्यांच्या आई वडिलांच्या जन्म तारखेचा किंवा स्थानाचे कोणतेही प्रमाणपत्र मागितले जाणार नाही. जेवढी त्या व्यक्तीला योग्य माहिती असेल त्याच आधारावर ती माहिती नोंदवली जाणार आहे. जर कोणाला आपल्या आई वडिलांची जन्म तारीख माहिती नसेल आणि फक्त साल माहिती असेल तर त्या वर्षाची १ जानेवारी ही जन्मतारीख मानली जाईल अन् तशी ती नोंदवली जाईल.