Bengaluru stampede : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आरसीबी संघाचा विजयोत्सवाला बुधवारी चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. ५० हून अधिक क्रिकेटप्रेमी जखमी झाले आहेत. अचानक विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन का केले ?, याबाबत कर्नाटक सरकारने खुलासा केला आहे. तसेच हा खुलासा करताना अप्रत्यक्षपणे चेंगराचेंगरी दुर्घटनेचे खापर आरसीबी संघासह कर्नाटक राज्य क्रिकेट संघटने (KSCA)वर फाेडले आहे. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष खरं तर, भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी काँग्रेस सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे आवश्यक व्यवस्थेत त्रुटी राहिल्या आणि एवढी मोठी दुर्घटना घडली, असा आरोप भाजपने केला आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. चौकशी अहवाल सरकारकडे येऊ द्या आणि जर काही त्रुटी आढळल्या तर जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) यांनी कार्यक्रम करावा, अशी विनंती केली नव्हती. त्यांनीच विजय उत्सव आयोजित केला होता. त्यांनीच संघ बंगळुरूला आणला होता. सरकारला असेही वाटले की, त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत, कारण ती बंगळुरूची टीम होती. सरकारने केवळ त्यासाठी सहकार्य केले.ही घटना घडल्याचे मला खूप दुःख आहे." दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी काँग्रेस सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे आवश्यक व्यवस्थेत त्रुटी राहिल्या आणि एवढी मोठी दुर्घटना घडली, असा आरोप भाजपने केला आहे.
बंगळूरु चेंगराचेंगरीच्या घटनेची कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल घेतली आहे. या प्रकरण आज दुपारी २.३० वाजता सुनावणी होणार आहे.
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर बोलताना कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे म्हणाले की, "हो, चूक झाली आहे. चांगल्या नियोजन आणि समन्वयाने हे टाळता आले असते. एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ३५,००० लोक बसू शकतात, पण २-३ लाख लोक रस्त्यावर उतरले. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले तरी गर्दी नियंत्रित करू शकलो नाही. या दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे. भाजपला प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायला आवडते. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याचा भाजपचा हेतू योग्य नाही."
आरसीबी संघाचा विधानभवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. त्यामुळे सुमारे एक लाख चाहत्यांनी स्टेडियमकडे धाव घेतली. हजारो चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 युवक आणि4 युवतींचा समावेश आहे. ५० जण जखमी झाले असून यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर बौरिंग आणि वैदेही या दोन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुर्घटनेबद्दल जनतेची माफी मागितली आहे.