

Bengaluru stampede : तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाचा परमोच्च आनंद अल्पजीवी ठरला. आरसीबी संघाचा अचानक ठरवण्यात आलेला विजयोत्सव याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी बुधवारी (दि.३ जून) हजारो चाहत्यांनी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आपल्या तरुण मुलाला गमावलेल्या वडिलांनी कर्नाटक सरकारला केलेल्या आवाहनाने उपस्थित हेलावले.
माध्यमांशी बोलताना मृत युवकाचे वडील म्हणाले की, "मला एकुलता एक मुलगा होता. मी तो गमावला आहे. तो मला न सांगता चिनास्वामी स्टेडियमवर आरसीबी संघाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आला होता. चेंगराचेंगरीत त्याचा मृत्यू झाला. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट देऊ शकतात, पण कोणीही त्याला परत आणू शकत नाही."
माझा मुलाचा मृत्यू झाला आहे. पोस्टमॉर्टम करू नका. त्याच्या शरीराचे तुकडे करू नका. मला किमान त्याचा मृतदेह द्या, अशी हद्यपिळवटून टाकणारी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली. दरम्यान, सरकारने आज सकाळी मृत्युमुखी पडलेल्या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले.
आरसीबी संघाचा विधानभवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. त्यामुळे सुमारे एक लाख चाहत्यांनी स्टेडियमकडे धाव घेतली. हजारो चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 युवक आणि4 युवतींचा समावेश आहे. ५० जण जखमी झाले असून यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर बौरिंग आणि वैदेही या दोन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुर्घटनेबद्दल जनतेची माफी मागितली आहे.