पुढारी ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ६० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. भाजपने आतापर्यंत ३४ जागा जिंकल्या असून मुख्यमंत्री पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यास तयार आहेत हे स्पष्ट झाले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची निराशाजनक कामगिरी आहे. आतापर्यंत काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्तो विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. भाजपने राज्यातील सर्व ६० जागा लढवल्या तर काँग्रेसने केवळ १९ जागांवर उमेदवार उभे केले होते. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) हे राज्यातील इतर दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ६ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. अरुणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिल रोजी विधानसभेसाठी ८२.९५ टक्के मतदान झाले होते. विधानसभेचा कार्यकाळ २ जून रोजी संपणार आहे. पेमा खांडू हे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे स्पष्ट होत आहे.
बोमडिला, चौखम, हायुलियांग, इटानगर, मुक्तो, रोईंग, सागली, ताली, तलीहा आणि झिरो-हापोली यासह भाजपने विधानसभा निवडणुकी आधीच १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चौना में यांच्यासह १० जणांचा समावेश आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) सत्तेवर आपली पकड कायम ठेवली होती. ६० सदस्यीय विधानसभेत भाजपला बहुमत मिळाले होते. भाजपने ३७ जागा जिंकून बहुमत मिळविले होते. जेडीयूला ७ आणि काँग्रेसला ४ जागा मिळाल्या होत्या. पहिल्यांदाच जनता दलने ७ जागा जिंकल्या होत्या तर २ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते.
हेही वाचा :