Andhra population policy
विजयवाडा: राज्यातील घटत्या लोकसंख्येचा आलेख उंचावण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कुटुंबांना तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर ३०,००० रुपये आणि चौथ्या अपत्याच्या जन्मावर ४०,००० रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसन्नापेटा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना नायडू म्हणाले की, सरकारने हा निर्णय घेतला असून पुढील एका महिन्यात याचे सविस्तर तपशील जाहीर केले जातील. 'स्वर्णांध्र-स्वच्छांध्र' स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान बोलताना नायडू म्हणाले, "मी एक नवीन निर्णय घेतला आहे. तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर लगेचच आपण ३०,००० रुपये आणि चौथ्या अपत्यासाठी ४०,००० रुपये देणार आहोत. हा निर्णय योग्य नाही का?"
एकेकाळी लोकसंख्या नियंत्रणाच्या उपायांचे समर्थन करणारे मुख्यमंत्री नायडू आता मात्र बदललेल्या भूमिकेत दिसत आहेत. जन्मदर वाढवण्यासाठी आता समाजाने एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.नायडू यांची ही घोषणा त्यांच्या आधीच्या एका प्रस्तावानंतर आली आहे, ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी २५,००० रुपयांचे प्रोत्साहन देण्याचे सुचवले होते. ५ मार्च रोजी त्यांनी विधानसभेत माहिती दिली होती की, राज्य सरकार दुसऱ्या अपत्यासाठी २५,००० रुपयांचा भत्ता देण्याचा विचार करत आहे.
नायडू यांच्या मते, बदलत्या सामाजिक आणि आर्थिक प्रवाहांमुळे कुटुंबाचा आकार लहान होत चालला आहे. उत्पन्न वाढल्यामुळे काही जोडपे एकाच मुलाला प्राधान्य देत आहेत, तर काही जोडपे पहिले अपत्य मुलगा नसेल तरच दुसऱ्या अपत्याचा विचार करतात.
लोकसंख्या वाढीचा वेग मंदावत असल्याचे सांगत त्यांनी 'रिप्लेसमेंट-लेव्हल टोटल फर्टिलिटी रेट' (TFR) २.१ वर राखण्याच्या गरजेवर भर दिला. जेव्हा सरासरी प्रजनन दर प्रति महिला २.१ मुले असतो, तेव्हा लोकसंख्या स्थिर राहते, असे सांगत त्यांनी इशारा दिला की, अनेक देशांमधील घटती लोकसंख्या आणि वयोवृद्ध होत चाललेल्या समाजामुळे तेथील आर्थिक विकासाला फटका बसला आहे. "मुले हा बोजा आहेत हा विचार चुकीचा आहे; मुले ही देशाची संपत्ती आहेत आणि मी हे सिद्ध करून दाखवेन," असा विश्वासही नायडू यांनी व्यक्त केला.