Air India International Flight Cancellation
मुंबई: विमान इंधनाचे वाढले दर, विविध देशांमधील हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि लांब पल्ल्याच्या मार्गांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे तोट्यात जात आहेत. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने जून ते जुलै दरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी दिली.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधनाचे दर कडाडले आहेत, तसेच चलनाचे बदलणारे दर आणि हवाई क्षेत्रातील निर्बंधांमुळे एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.विमान इंधनाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि सुरू असलेल्या हवाई निर्बंधांमुळे अनेक मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाहीत. त्यामुळे कंपनीने जून आणि जुलैमध्ये उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक कम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, "वाढत्या आव्हानांमुळे जून आणि जुलैच्या वेळापत्रकात कपात करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. जेट इंधनाच्या वाढत्या किमती आणि लांब पल्ल्याच्या मार्गांमुळे एअर इंडियाने एप्रिल आणि मे महिन्यातही काही उड्डाणे आधीच कमी केली होती.
भारतातील विमान वाहतूक उद्योगाने इंधन दरवाढीमुळे निर्माण झालेल्या संकटावर सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स' (FIA) ने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून इशारा दिला आहे की, इंधन दरवाढीमुळे हा क्षेत्र 'अत्यंत तणावाचा' सामना करत आहे.
इंधनाचा वाटा: विमानाचा एकूण खर्च पूर्वी ३०-४०% असायचा, तो आता वाढून ५५-६०% पर्यंत पोहोचला आहे.पश्चिम आशियातील संघर्षामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडियाला लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे, ज्यामुळे इंधन जास्त लागते आणि खर्च वाढतो. विल्सन यांनी या परिस्थितीचे वर्णन "अत्यंत आव्हानात्मक" असे केले असून घरगुती उड्डाणांच्या नफ्यावरही परिणाम झाला असल्याचे सांगितले. मात्र, सरकारी हस्तक्षेपामुळे घरगुती पातळीवर थोडा दिलासा मिळाला आहे.
विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना या कठीण काळात "एकजूट" राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. मध्यपूर्वेतील परिस्थिती लवकर सुधारेल आणि 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) सारखे महत्त्वाचे मार्ग पुन्हा खुले होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एअर इंडिया ग्रुपला २२,००० कोटी रुपयांहून अधिक तोटा झाल्याचा अंदाज आहे. या वर्षाच्या अखेरीस पदमुक्त होणारे कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, इंधनाचे दर कमी झाल्यावर आणि हवाई निर्बंध उठल्यावर एअर इंडिया पुन्हा सामान्य सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.