गुजरातची राजधानी अहमदाबादहून लंडनला दुपारी निघालेले एअर इंडियाचे एआय 171 हे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच मेघानीनगर या गजबजलेल्या परिसरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या होस्टेलवर कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
विमानात 10 क्रू मेंबरसह 242 प्रवासी होते. होस्टेलमधील 20 डॉक्टरांचाही मृत्यू झाला. या अपघातात एकूण 261 जण ठार झाले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही बेशुद्ध प्रवाशांना दाखल केले असले, तरी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला; तर रमेश विश्वास कुमार हा प्रवासी मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावला.
अपघातानंतर शक्तिशाली स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि आगीचे लोळ अन् धुराचे लोट आकाशात उंचवर पोहोचल्याचे दिसत होते. भारतातील गेल्या 50 वर्षांतील हा सर्वात भीषण विमान अपघात आहे. या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडल्यानंतर अपघाताचे नेमके कारण समजू शकेल.
बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान हे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असणारे विमान आहे. तरीही उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच कोसळल्याने हा अपघात आहे की, घातपात? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.