Delhi Marathi food and art festival Pudhari
राष्ट्रीय

Bharat Jadhav | दिल्लीत मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी : अभिनेते भरत जाधव

Delhi Marathi festival | राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ३ दिवसीय संक्रांति महोत्सव

पुढारी वृत्तसेवा

Delhi Marathi food and art festival

नवी दिल्ली : एक कलाकार म्हणून कलेविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी बोलताना मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त न करण्याजोगा असतो. दिल्लीत आणि तेही महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच असा अनुभव घेताना मनापासून समाधान वाटत आहे, अशा भावना प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केल्या.

राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ३ दिवसीय संक्रांति महोत्सव आणि हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले. या महत्त्वाचे उद्घाटन भरत जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. भरत जाधव म्हणाले की, दिल्लीसारख्या महानगरात, जिथे विविध प्रांतांचे लोक येतात, तिथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची चव पोहोचवणे हे अभिमानास्पद कार्य आहे. दिल्लीतील मराठी उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड, माहिती संचालक हेमराज बागुल सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होत्या.

महाराष्ट्राची समृद्ध परंपरा सर्वदूर पोहोचवणे हेच आमचे ध्येय - निवासी आयुक्त आर. विमला

याप्रसंगी बोलताना आर. विमला म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अटकेपार झेंडा फडकवून महाराष्ट्राची प्रचिती दिली, तोच सांस्कृतिक वारसा आज दिल्ली दरबारात आणि संपूर्ण देशात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. मकर संक्रांत हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, या विविधतेतील एकता जपत महाराष्ट्राची विशेष खाद्य संस्कृती, विशेषतः ' हुरडा' आणि मराठमोळ्या परंपरा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा आमचा मानस आहे." ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या भावना आणि संस्कृती अधिक प्रभावीपणे मांडली जात असून, यातून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख दिल्लीत निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महोत्सवात काय काय?

या महोत्सवात सोलापूर, ठाणे, पुणे, जळगाव, रायगड, परभणी, अहिल्यानगर, जालना आणि नाशिक अशा विविध जिल्ह्यांतील महिला बचत गटांनी सहभाग घेतला असून एकूण १६ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये 'उमेद'चे (राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) १० आणि कृषी विभागाचे ६ स्टॉल आहेत. महोत्सवात ज्वारीच्या कोवळ्या हुरडासोबत खमंग लसूण चटणी, शेंगदाणा कूट, पिवळाधमक गूळ, साजूक तूप आणि ताक यांची रेलचेल आहे. तसेच चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी, भरीत-भाकरी, बटाटेवडे, भजी, ऊस, बोरं आणि ओला हरभरा अशा अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद खाद्यप्रेमी घेत आहेत. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त कॉपर मेटलचे दागिने आणि हस्तकला वस्तू हे देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरणही येथे करण्यात आले आहे. यामध्ये महाडीबीटी पोर्टल, कृषी सल्ल्यासाठी 'महाविस्तार ॲप' आणि राज्यामध्ये एकूण ३८ पिकांना मिळालेले जीआय (GI) मानांकन याविषयीची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच संक्रांत सणानिमित्त वापरण्यात येणारे बोर, ऊस, हरभरा आणि लहान मुलांच्या 'बोरनहान'साठी लागणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन रांगोळीच्या माध्यमातून आकर्षकरीत्या मांडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT