नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : अवैध कोळसा खणन घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेले तृणमूल काँग्रेसचे नेते व खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) तसेच त्यांच्या पत्नी रुजीरा यांची कोलकातामध्ये 'ईडी'कडून चौकशी होणार आहे. ईडीच्या दिल्ली मुख्यालयातील चौकशीला अभिषेक व रुजीरा यांनी विरोध केला होता. त्यानंतर कोलकाता येथे चौकशी करण्यास परवानगी दिली जावी, असा विनंती अर्ज ईडीने दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने त्यांच्या कोलकाता येथील चौकशीला हिरवा कंदील दाखविला आहे.
(Abhishek Banerjee) अभिषेक व त्यांच्या पत्नीच्या कोलकाता येथील चौकशीत ममता बॅनर्जी सरकारचा कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे ईडीकडून न्यायालयाला सांगण्यात आले. दरम्यान, अभिषेक यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस जारी केली आहे. तीन आठवड्यात त्यानुसार उत्तर द्यायचे आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे.
दरम्यान, डी प्रकरणात अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी यांची कोलकाता येथे चौकशी होणार असून राज्य यंत्रणांचा यात कोणताही अडथळा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ईडीने या दोघा पती-पत्नीला नोटीस बजावून २२ मार्चला दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याआधी ईडीच्या चौकशीत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. तृणमूल कॉंग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी आणि पक्षाची शक्ती कमी करण्यासाठी भाजप डावपेच करत आहे. भाजपचा डाव आपण हाणून पाडू, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला होता.
अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात ईडीने सीबीआयच्या २०२० च्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. अभिषेक यांच्या विरोधात आसनसोल, कुनुस्तोरिया आणि कजोरा येथे ईस्टर्न कोल्डफील्डस लिमिटेडच्या खाणतून कोळसा उत्खननात कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका आहे. आता ईडीच्या चौकशीत राज्यातील यंत्रणांचा हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने, त्यांच्या अडचणीत वाढ होणार का, अशी चर्चा सुरु आहे.
हेही वाचलंत का ?