Abhishek Banerjee attack news
कोलकाता : पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पाच जणांपैकी दोघेजणड टीएमसीच्या माजी आमदार आणि यंदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या लवली मैत्रा यांचे निकवटर्ती आहेत. लवली मैत्रा २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून जिंकून आल्या होत्या. यंदाही तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता, मात्र भाजपच्या रूपा गांगुली यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.दरम्यान, अभिषेक यांच्यावर हल्ला करण्यामागचे मुख्य कारण काय होते, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
बंगाल पोलिसांनी बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या व्हिडिओच्या आधारे पाच जणांना अटक केली आहे. तपन मैती, निर्मल्य सेनगुप्ता उर्फ जॉय, काजोल दास, देबासिस दत्ता आणि आकाश गायन अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल्य आणि तपन हे टीएमसीच्या माजी आमदार आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रूपा गांगुली यांच्याकडून पराभूत झालेल्या लवली मैत्रा यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. याशिवाय, काजोल दास आणि देबासिस दत्ता यांचे संबंधही टीएमसीच्या या माजी आमदाराशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी तृणमूलचा कार्यकर्ताआकाश गायन याला अटक झाली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा तृणमूलचा कार्यकर्ता होता. या निवडणुकीत तो सातत्याने टीएमसीच्या बूथ लेव्हल बैठकांना उपस्थित राहायचा. आकाशच्या आईने सांगितले की, शनिवारी दुपारच्या घटनेनंतर तो नेहमीप्रमाणे घरी आला, जेवण केले आणि मैदानावर फुटबॉल खेळायला निघून गेला. यानंतर रात्री पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, पोलिसांनी अद्याप कुटुंबाला आकाशच्या अटकेचे कोणतेही कारण सांगितलेले नाही.
शनिवारी टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी हे निवडणूक हिंसाचारात ठार झालेल्या एका कार्यकर्त्याच्या घरी जात होते. यादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्यावर अंडी आणि दगडफेक करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना हेल्मेट घालून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काही लोकांनी त्यांना ओढले आणि त्यांच्याशी धक्काबुक्की केली. या गदारोळात बॅनर्जी यांचा शर्टही फाटला. या घटनेनंतरही त्यांनी कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेतली.
अभिषेक बॅनर्जी यांच्यासह टीएमसीच्या सर्व नेत्यांनी या घटनेचा आरोप भाजपवर केला आहे. दुसरीकडे, भाजपने पलटवार करत हा लोकांच्या १५ वर्षांच्या संतापाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता प्राथमिक तपासानंतर अटक केलेल्या संशयितावरुन वेगळेच कारण समोर येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, अभिषेक बॅनर्जींसारख्या बड्या नेत्यावर झालेल्या हल्ल्याचे आरोप टीएमसीच्याच माजी कार्यकर्त्यांवर होत असल्याने तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, अभिषेक यांच्यावर हल्ला करण्यामागचे मुख्य कारण काय होते, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.