abhijeet dipke says cji suryakant used cockroach word for saurav das
पुढारी ऑनलाईन : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी दावा केला आहे की, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सौरभ दास यांच्यासाठीच ‘कॉकरोच’ म्हणजेच ‘झुरळ’ हा शब्द वापरला होता. कारण त्यावेळी सौरभ दास हे न्यायालये आणि न्यायाधीशांबाबत सर्वाधिक लिखाण करत होते. सौरभ दास यांनाही दीपके यांचे हे म्हणणे योग्य वाटते.
दीपके आणि दास यांच्या मते, न्यायालये आणि न्यायाधीशांबाबत लिखाण करणे तसेच माहितीच्या अधिकाराअंतर्गत (RTI) अर्ज दाखल करणे यामुळे सरन्यायाधीशांनी अशी टिप्पणी केली होती.
दिलेल्या एका मुलाखतीत सौरभ दास यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीबद्दल सांगताना म्हटले की, ते ‘लॉ’ म्हणजेच कायद्याशी संबंधित विषयांवर, विशेषतः न्यायाधीशांवर लिखाण करतात. याचदरम्यान अभिजीत दीपके यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले, “ज्या ‘कॉकरोच’ शब्दाचा वापर करण्यात आला होता, तो सौरभ यांच्यासाठीच होता. हेच खरे ‘ओजी कॉकरोच’ आहेत. कारण त्यावेळी सर्वाधिक लिखाण तेच करत होते.”
दीपके यांच्या या वक्तव्याला दुजोरा देत सौरभ दास म्हणाले, “त्यावेळी काही वकील आणि निवृत्त न्यायाधीशांनी माझ्याशी संपर्क साधून हा कमेंट तुमच्यासाठीच करण्यात आला आहे, असे सांगितले होते. कारण त्यावेळी मी सूर्यकांत यांच्यावर ‘कारवां’ मासिकासाठी एक प्रोफाइल लिहित होतो. यापूर्वी मी डी. वाय. चंद्रचूड यांच्यावरही लिहिले होते. त्याच पद्धतीने सूर्यकांत यांच्यावर प्रोफाइल तयार करत होतो. यासाठी मी काही RTI अर्जही दाखल केले होते.”
ते पुढे म्हणाले, “त्याच काळात त्यांनी म्हटले होते की, ‘या तरुणांना व्यवसायात नोकरी मिळत नाही आणि त्यामुळे ते मीडिया क्षेत्रात येतात, RTI कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करतात...’ त्यामुळे अनेकांना हा उल्लेख माझ्यासाठीच असावा असे वाटले. मला विचारले असता की, तुम्हालाही तसे वाटते का? तर मी म्हटले, ‘माहित नाही, होऊ शकते.’”
सरन्यायाधीशांची टिप्पणी तरुणांविरोधात असल्याचे सांगून प्रचार
दरम्यान, एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या टिप्पणीचा अर्थ ‘देशातील बेरोजगार तरुणांवर टीका’ असा लावण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयातच स्पष्टीकरण देत आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडले गेल्याचे सांगितले.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, “सुनावणीदरम्यान केलेल्या माझ्या तोंडी टिप्पणीचा माध्यमांतील एका वर्गाने चुकीचा अर्थ लावल्याचे वाचून मला दुःख झाले. बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारे वकिली यांसारख्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या लोकांवर मी टीका केली होती. अशाच प्रकारे काही लोक मीडिया, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही घुसले आहेत. त्यामुळे ते परजीवी आहेत, असे मी म्हटले होते. मी देशातील तरुणांवर टीका केली, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.”
सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवरूनच ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीला आधार बनवूनच ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जाते. सरन्यायाधीशांच्या टिप्पणीच्या चर्चेनंतर अभिजीत दीपके यांनी एक्सवर, “सर्व कॉकरोच एकत्र आले तर काय होईल?” असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट केले होते.
हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर दीपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने एक्स आणि इन्स्टाग्राम हँडल तयार केले. इन्स्टाग्रामवर अवघ्या चार दिवसांत सुमारे 25 मिलियन फॉलोअर्स मिळाल्यानंतर अभिजीत दीपके चर्चेत आले. त्यानंतर ते अमेरिकेतून भारतात परतले आणि त्यांनी NEET पेपर लीकविरोधात आंदोलन उभे केले.