Latest

Nashik Devayani Farande : जायकवाडीला पाणी सोडण्यास आमदार फरांदेंचा विरोध

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; समन्यायी पाणीवाटपाच्या मेंढीगिरी समितीच्या अहवालावर फेरविचार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने या अहवालाच्या आधारे जायकवाडी धरणासाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशास स्थगिती देण्याची मागणी नाशिक पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली आहे. मराठवाड्यातील लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी दुष्काळी परिस्थितीत जायकवाडीच्या मृतसाठ्यामधून ५.९४ टीएमसी पाणीसाठा वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही आ. फरांदे (Nashik Devayani Farande)यांनी केली आहे.

संबधित बातम्या :

जायकवाडीसाठी (Jayakwadi Dam) पाणी सोडण्याच्या आदेशामुळे नाशिक व अहमदनगरचे पाणी पेटले आहे. यंदा नाशिक व अहमदनगरमध्ये झालेला अपुरा पाऊस, खरीप पिकांचे होणारे नुकसान आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीकडे आ. फरांदे (Nashik Devayani Farande) यांनी लक्ष वेधत जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय नाशिक व अहमदनगरवासीयांसाठी अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५२ टक्के पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत जायकवाडीस पाणी सोडल्यास जुलै महिन्यापर्यंत धरणांमधील साठे शिल्लक ठेवणे जिकिरीचे होणार आहे. २०१८ मध्ये नाशिक व नगरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आपण दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ४ आॉक्टोबर २०२३ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मेंढीगिरी समितीच्या अहवालावर फेरविचारासाठी समिती नियुक्त केली आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार नाशिक व अहमदनगरमधील वाढत्या लोकसंख्येनुसार वाढीव पिण्याचे, औद्योगिक तसेच शेतीची गरज विचारात घेणे आवश्यक होते. तसेच नव्याने नेमलेल्या समितीच्या शिफारशीही विचारात घेणे आवश्यक होते. परंतु तसे न करताच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकारी संचालकांनी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. ही बाब उच्च न्यायालयाच्या आदेशांचे अवमूल्यन करणारी असल्याने हा निर्णय स्थगित करण्याची मागणी आ. फरांदे यांनी केली आहे.

मृतसाठा वापरण्यास परवानगी द्यावी

जायकवाडी प्रकल्पातून २०१२ मध्ये १०.५२ टीएमसी, २०१५ मध्ये १२.८४ टीएमसी व २०१८ मध्ये ९ टीएमसी पाणी सोडूनही जायकवाडीच्या मृतसाठ्यातून सुमारे १० टीएमसी पाणी वापरले गेले होते. जायकवाडीच्या मृतसाठ्यातून सातत्याने पाणीवापर होत असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यासाठी जायकवाडी जलाशयास ६५ टक्के उपयुक्त साठा होण्यासाठी या धरणाच्या मृतसाठ्यातून ७.७५ टक्के अर्थात ५.९४ टीएमसी पाणी वापरण्यास अपवादात्मक परिस्थितीत शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही आ. फरांदे (Nashik Devayani Farande)यांनी केली आहे.

४० टक्के पाणी वाया जाणार

नाशिक व अहमदनगरमधील धरणांतून एकूण ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये २.६ टीएमसी इतकी वहन तूट गृहीत धरली असून, प्रत्यक्षात ५.९ टीएमसी इतकेच पाणी जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. मात्र यापूर्वीच्या अनुभवानुसार वहन तूटही ४० ते ४५ टक्के इतकी येते. त्यामुळे नाशिक व अहमदनगरमधील धरणांमधून सोडलेले बहुमोल पाणी जायकवाडीत किती पोहोचेल यात शंका असल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT