नाना पटोले 
Latest

महागाई, जीएसटी, बेरोजगारी आणि अग्निपथविरोधात उद्या राजभवनला घेराव घालणार : नाना पटोले

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असताना जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. म्हणून उद्या शुक्रवारी (दि. ५ ऑगस्ट) रोजी राजभवनला घेराव घातला जाणार असून त्यानंतर जेलभरो करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे.

तर मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले. मात्र, केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी 'अग्निपथ' नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्तांना तातडीने मदत द्यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा व महापुरुषांचा अवमान करत असतात. मुंबईबद्दल बोलूनही त्यांनी मराठी माणसांचा अवमान केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असून त्यांच्या बोलण्यातून भाजपा व आरएससची शिकवण नेहमी दिसून येत आहे असेही पटोले म्हणाले.

यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाईल व त्यानंतर जेलभरो केले जाणार आहे. राज्यातील स्थानिक नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT