Latest

नागपूर : थकीत भाड्यामुळे ठाकरे गटावर कार्यालय रिकामे करण्याची नामुष्की

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : गणेशपेठ बस स्थानक परिसरातील रॉय उद्योग समूहाच्या रजत संकुल इमारतीत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय वीजबिल, थकीत भाडे यामुळे रिकामे करण्यात आल्याची माहिती आज (दि.२८) समोर आली. नागपूरसह पूर्व विदर्भात शिंदे गटाने आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पाच वर्षाचे रेंट एग्रीमेंट संपल्याने हे कार्यालय रिकामे करण्यात आल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.

प्रसिद्ध उद्योजक किशोर राय यांच्या मालकीच्या रजत संकुल इमारतीत शिवसेनेचे विभागीय कार्यालय होते. संपर्कप्रमुख म्हणून तानाजी सावंत असताना या कार्यालयाचे धडाक्यात उद्घाटन झाले होते. त्यानंतर अनेक संपर्कप्रमुखांनी याच ठिकाणी बैठकांमधून शिवसेनेला मजबुती देण्याचा प्रयत्न केला. असे असताना शिवसेनेच्या ठाकरे गटावर हे कार्यालय बंद करण्याची वेळ का यावी, हा प्रश्नच आहे.

पाच वर्षांपूर्वी संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात पाच वर्षांचे रॉय यांच्याशी रेंटल एग्रीमेंटवर हे कार्यालय आम्ही घेतले होते. आता ते संपले. त्यामुळे चार महिन्यापूर्वीच हे कार्यालय आम्ही रिकामे करून दिले आहे. मालकाला ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी रिकामे करून हवे असल्याने आम्ही ते रिकामे करून दिले आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते नितीन तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवसेना ठाकरे गटाला येनकेन प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून सुरू आहे. शिवसेनेचे रेशीमबाग परिसरात खूप वर्षापासून कार्यालय असून, ते शिवसेनेच्याच नावावर आहे. यामुळे कार्यालय बंद करण्याची नामुष्की वगैरे आरोप करण्यात अर्थ नाही, असा दावा तिवारी यांनी केला.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT