नागपूर : पुढारी ऑनलाईन नागपूर मध्ये मध्यरात्री ढगफुटीसारखा पाउस झाला. यामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्बल ५ फुटांपर्यंत पाणी शिरले. दरम्यान नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुरामुळे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. (Nagpur Rain)
नाग नदीकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात येत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याने नागपूरकरांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सिताबर्डी भागालाही पुराचा फटका बसला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे,
"नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
हेही वाचा :