पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले, तर राज्यातील शिंदे सरकार नक्कीच पडेल, असे वाटते. त्यानंतर शिंदे गटासह उर्वरित आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. भाजप हा संख्येने सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपाल त्यांच्याशी संपर्क साधतील आणि त्यांच्याकडे संख्याबळ असेल, तर ते सरकार स्थापन करू शकतील, अशीही शक्यता आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर निर्णय घेतील. दरम्यान, १६ आमदार जरी अपात्र ठरले, तरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही, सरकारला कोणताही धोका नाही, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (Jayant Patil)
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. न्यायालयाने दिलेल्या निर्णयात संविधानिक शिस्त कायम ठेवली आहे. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. मी राजकीय दबावाखाली येऊन निर्णय घेईन, असा वारंवार आरोप होतो; पण मी हा आरोप थांबवू शकत नाही. मी आत्तापर्यंत कोणतेही काम दबावाखाली केलेलं नाही. इथून पुढे देखील कोणाच्याही दबावाखाली काम करणार नाही. लवकरात लवकर निर्णय घेऊ, पण यामध्ये कोणतीही घाई केली जाणार नाही, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
माझ्याकडे ५४ आमदारांविरूद्ध याचिका दाखल झाल्या आहेत. यातील प्रत्येक याचिकेची दखल घेत आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय घेतला जाईल. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा घटनेला अनुसरून आणि नियमानुसारच घेतला जाईल. कोर्टाला सत्तासंघर्षावरील निर्णय देण्यास १० महिने लागले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना देखील वेळ लागू शकतो. घटनात्मक बाबी तपासून याविषयी निर्णय घ्यायला किती काळ लागेल, हे मी सांगू शकत नाही, असेही नार्वेकर यांनी या वेळी स्पष्ट केले.
हेही वाचा