गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली येथे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु केंद्र व राज्य सरकारने मदत केली नाही. याचा निषेध करीत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी शिवणी येथील बांधावर जाऊन मुंडन केले.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व मेडिगड्डा धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या प्रचंड विसर्गामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार आणि तिबार पेरणीची वेळ आली. परंतु सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, पूर पीडितांना रबी हंगामात तत्काळ बियाणे पुरविण्यात यावे, पूरग्रस्तांनी घेतलेले पीक कर्ज माफ करण्यात यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते तसेच शेतकऱी उपस्थित होते.
हेही वाचा