जिल्ह्यातील पुसद-वाशिम रोडवरील भवानी टेकडीजवळ कारचे नियंत्रण सुटल्याने गुरुवारी (दि.२२) अपघात झाला. हा अपघात रात्री साडेबारा वाजता दरम्यान घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चारजण गंभीर जखमी आहेत. या अपघातात आकाश नेमीचंद जाधव (वय.२३) आणि ऋषिकेश प्रभाकर टाले (वय.२२) या दोघांचा मृत्यू झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वाहन पाठीमागे घेताना वाहनावरचा ताबा सुटल्याने कार विजेच्या खांबावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले. या अपघातात मधुकरनगरातील रहिवासी अक्षय पाईकराव, विजय गोटे, श्रीरामपूर येथील तुषार आडे यांच्यासह अन्य एक असे चारजण जखमी झाले आहेत. तुषार आडे याला नांदेड येथे भरती करण्यात आले आहे. दोघांवर पुसद येथे उपचार सुरू आहेत, तर एका अनोळखी जखमीला नातेवाइकांनी उपचारासाठी बाहेरगावी नेले.
पुसद तालुक्यातील ब्राह्मणगाव उडदी येथे राहणारा व मुंबई येथे कामासाठी वास्तव्यात असणारा आकाश जाधव हा श्रीरामपूर येथे राहणाऱ्या त्याच्या मावस बहिणीकडे राखी पौर्णिमेसाठी आला होता. बऱ्याच दिवसांनंतर आपला मित्र गावी आल्याने आकाशला भेटण्यासाठी त्याचे मित्र आले होते. चारचाकी वाहनाने आकाशसह त्याचे पाच मित्र खंडाळा येथे चहा पिण्यासाठी घटनेच्या रात्री जात होते. गाडीवरचा ताबा सुटल्याने वाहन रिव्हर्स येऊन विजेच्या खांबावर आदळले. या अपघातात आकाश व ऋषिकेशचा मृत्यू झाला.