यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: यवतमाळ जिल्ह्यात आज (दि.२३) दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आर्णी येथे मोबाईल चोरीच्या वादातून तर पांढरकवडा तालुक्यातील सखी (बु) येथे शेतीच्या वादातून इसमाचा खून करण्यात आला. दोन्ही घटनेतील आरोपींना (Murder in Yavatmal) पोलिसांनी अटक केली आहे.
(Murder in Yavatmal) आर्णी शहरातील तुफान हॉटेल येथे मोबाईल चोरीच्या वादातून केलेल्या हल्यात युवकाचा मृत्यू झाला. ही घटना २२ ऑगस्टला रात्री ११ च्या सुमारास घडली. रिजवान बेग कय्युम बेग (वय ३९, रा. मुबारकनगर, आर्णी) असे मृत इसमाचे नाव आहे. तर सैयद बाबु सैयद गफुर (वय ५०, रा. मोमीनपुरा आर्णी) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी सैयद बाबु सैयद गफुर व हॉटेल चालकाचा पुतण्या मृत रिजवान बेग हे दोघे शहरातील तुफान हॉटेलमध्ये काम करीत होते. दरम्यान, सोमवारी दोघामध्ये मोबाईल चोरल्याचा कारणावरून वाद झाला. मृत हा आरोपीवर मोबाईल चोरल्याचा आरोप करीत होता. त्यानंतर हॉटेल मालकाने सदर वाद सोडविला व आरोपीला घरी पाठविले. मृत हा रात्री ११ च्या दरम्यान हॉटेलवर बाहेर निद्रावस्थेत असताना आरोपी वचपा काढण्याचा उद्देशाने परत आला. व मृताच्या डोक्यावर फाडीने तब्बल सहा वेळा वार केले. या हल्ल्यात रिजवान हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला प्रथम यवतमाळ व नंतर वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पांढरकवडा तालुक्यातील सखी( बु ) येथे २० ऑगस्टला गावालगतच्या तलावात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह गावातीलच बाबाराव दौलत मेश्राम (वय ४०, रा. सखी बुद्रुक) याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. मृत १० दिवसापासून बेपत्ता होता. मात्र मृतदेह मिळाल्याने मृताच्या पत्नीने संशय घेत जुन्या वादाचा उल्लेख केला. पांढरकवडा पोलिसांनी तपासचक्रे फिरवत गावातीलच आरोपी भीमराव अर्जुन मेश्राम (वय ४२) याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी भीमराव मेश्राम याने खुनाची कबुली दिली. १० ऑगस्टला शेतीच्या वादातून आपणच खून केल्याचे मान्य केले.
हेही वाचलंत का ?