Washim Bribery Case
वाशिम: जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील तत्कालीन सहायक लेखा अधिकारी आणि कनिष्ठ सहायक यांना २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. ४ ) दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
सुभाष मोतीराम इंगळे (सहायक लेखा अधिकारी, वर्ग-३) आणि निलेश मधुकर लंगोटे (कनिष्ठ सहायक, वर्ग-३) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
२००८ मध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या निधीचा तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १७ हजार रुपये सुरुवातीला स्वीकारल्यानंतर, उर्वरित ३ हजार रुपये ३० मे २००८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रचलेल्या जाळ्यात आरोपींनी स्वीकारले. याप्रकरणी वाशिम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, वाशिम यांनी आज दोन्ही आरोपींना कलम ७ अन्वये ४ वर्षे शिक्षा व २५ हजार रुपये दंड, तसेच कलम १३ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड अशी एकूण ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीराम नारायण काळू यांनी बाजू मांडली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने केली होती.