BJP Raju Patil Raje Property Inquiry Demand
वाशीम : भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा वाशीम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वाशीम येथील सकल माळी समाजाने केली आहे. याबाबत १६ मार्चरोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शहर पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भारत हेंबाडे उर्फ राजू पाटील राजे यांनी तेजराव इनामदार यांच्यासह इतरांच्या विरोधात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल केलेली तक्रार दिशाभूल करणारी असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, राजे यांच्या संपत्तीमध्ये झालेली वाढ आणि त्यामागील आर्थिक स्रोत यांची सखोल व निष्पक्ष चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यांच्या आर्थिक प्रगतीबाबत समाजात विविध शंका निर्माण झाल्याचे नमूद करत, पूर्वीच्या परिस्थितीपासून आतापर्यंतच्या प्रवासाची चौकशी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित व्यक्तीवर पूर्वीही आर्थिक व्यवहारांबाबत वाद निर्माण झाले असून, काही प्रकरणांत लोकांना त्रास दिल्याच्या चर्चा आहेत. तसेच विरोध केल्यास दबाव टाकणे किंवा खोट्या तक्रारी दाखल करण्याचे प्रकार होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे वाशीम जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, विविध स्तरांतून चर्चांना उधाण आले आहे. अद्याप राजू पाटील राजे यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर नागोराव ठेंगडे, राजू भांदुर्गे यांच्यासह सुमारे ८० समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही माळी समाजाने दिला आहे.